Shirur: विकासाचे दावे फोल ठरल्याने विषय भरकटविण्याचा शिवसेनेचा केविलवाणा प्रयत्न – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना खासदारांनी 15 वर्षे देशाच्या संसदेत नेतृत्व केले. 15 वर्षात एकही आश्वासन खासदार पूर्ण करु शकलो नाही. विकासाचे केलेले दावे फोल ठरले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेकडून विषय भरकटविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे, असे प्रत्युतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले. तसेच ‘मराठी टायगर’ या चित्रपटाच्या समर्थनार्थ शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’त छापून आलेला अग्रलेख विसरलात का? असा सवालही कोल्हे यांनी विचारला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यावरील डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रेम बेगडी आहे. त्यांनी ऐतिहासिक पन्हाळगडावर सन 2016 मध्ये ‘मराठी टायगर’ या चित्रपटासाठी ‘प्रेमगीता’चे चित्रिकरण केल्याचा आरोप करत याप्रकरणी कोल्हे यांनी माफी मागावी अशी मागणी, शिवसेनेच्या महिला आघाडीने आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत केली होती.

  • त्याला डॉ. कोल्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या गोष्टीने भोसरीतील रेडझोनचा प्रश्न सुटणार आहे का?, शास्तीकर, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सुटणार आहे का?, असा सवाल उपस्थित करत डॉ. कोल्हे म्हणतात, शिरुरचे 15 वर्षे नेतृत्व करुनही खासदाराना जनतेचे प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे.

जनतेचा मला मिळत असलेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी सन्माननीय खासदार यांना विचारावे की 15 वर्षात संसदेत संरक्षण विषयक जे 128 प्रश्न विचारले आहेत. त्यात रेडझोन संदर्भात एकही नाही. हे कसे काय? असेही डॉ. कोल्हे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.