Mumbai : किराणा दुकानदारांना प्लास्टिक पॅकिंग करण्याची सशर्त परवानगी
एमपीसी न्यूज- राज्य शासनाने पाव किलोपासून पुढील वजनाच्या किराणा मालाच्या प्लास्टिक पॅकिंगसाठी सशर्त परवानागी दिली आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बुधवारी याची घोषणा केली. आजपासून ही बंदी उठवण्यात येणार असून त्यामुळे किराणा दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात सर्वत्र प्लास्टिक बंदी लागू झाली असून प्रशासनाकडून याची कठोर अंमलबजावणीही करण्यात येत आहे. मात्र, यामुळे छोट्या किराणा दुकानदारांसमोर माल सुरक्षितरित्या बांधून कसा द्यायचा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यांची ही अडचण लक्षात घेऊन पाव किलोपासून पुढील वजनाच्या किराणा मालासाठी प्लास्टिक पॅकिंगसाठी राज्य शासनाने सशर्त परवानागी दिली आहे.
या पॅकिंगवर प्लास्टिकचे मायक्रॉन, पॅकिंगची तारीख यांसारख्या गोष्टी छापाव्या लागणार आहेत. तसेच दूध पिशव्यांप्रमाणे हे प्लास्टिंकचे पॅकिंग ग्राहकांकडून पुन्हा मागवून घेऊन त्याचा पुनर्वापर कसा करणार याची माहितीही दुकानदारांना द्यावी लागणार आहे. या सर्व गोष्टींचे दुकानदाराने लेखी आश्वासन दिल्यानंतरचत्यांना ही परवानगी देण्यात येणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले आहे.