Sonu Sood’s appeal: जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलण्याची सोनू सूदची मागणी

परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना केंद्र सरकार मात्र परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीतही न्यायालयाने परीक्षा घेतली पाहिजे असा निर्वाळा दिला आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून घेतल्या जाण्याऱ्या जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी अनेकांकडून केली जात आहे. यामध्ये आता बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने ट्विट करत केंद्र सरकारला परीक्षा पुढे ढकलावी अशी विनंती केली आहे. या कोरोना संकटात आपण विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालता कामा नये असं त्याने म्हटलं आहे.

सोनू सूदने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘देशातील सध्याची परिस्थिती पाहता जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलली जावी अशी माझी भारत सरकारला विनंती आहे. सध्याच्या कोरोना स्थितीत आपण विद्यार्थ्यांबद्दल जास्त काळजी घेणं गरजेचं असून त्यांना संकटात टाकू नये’.

परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना केंद्र सरकार मात्र परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीतही न्यायालयाने परीक्षा घेतली पाहिजे असा निर्वाळा दिला आहे.

स्वीडनची 17 वर्षीय पर्यावरणप्रेमी ग्रेटा थनबर्गने हिनेही परीक्षा घेण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. करोना संकटात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास सांगणं अन्यायकारक असल्याचं ग्रेटा थनबर्गने म्हटलं आहे. तिने ट्विट करत आपलं मत मांडलं आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (जेईई) आणि राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET UG) वेळेतच होणार असल्याचं नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) सांगण्यात आलं आहे.

एनटीएकडून वेबसाईटवर यासंबंधी अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. एनटीएने जेईई मुख्य परीक्षा ठरल्याप्रमाणे 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचं सांगितलं आहे. जेईई मुख्य परीक्षेसोबत नीट परीक्षाही वेळेतच होणार आहे. ही परीक्षा 13 सप्टेंबरला होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना कोरोना होण्याचा धोका असल्याचे लक्षात घेऊन सर्व परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नीट, जेईई, सीईटीसारख्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलाव्यात आणि देशातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सध्याचे जूनपासून सुरु झालेले नवे शैक्षणिक वर्ष जानेवारी 2021 पासून सुरु करावे, अशी मागणी महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

देशभरात प्रत्यक्ष वा ऑनलाइन परीक्षांसाठी सुरू असलेली प्रक्रिया, विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया स्थगित करून ती पुढे ढकलावी. त्याचबरोबर जून 2020 पासून नवे शैक्षणिक वर्ष सुरु होऊन दोन महिने उलटले असले तरी करोनामुळे शाळा-महाविद्यालये सुरू करता आलेली नाहीत.

त्यामुळे शैक्षणिक वर्ष वाया जात आहे. देशभरातील कोट्यवधी विद्यार्थ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी शैक्षणिक वर्ष जानेवारी 2021 पासून सुरु करण्याबाबत विचार करावा, अशी विनंतीवजा मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.