New Delhi: लॉकडाऊनमुळे देशात ठिकठिकाणी अडकलेल्या लोकांसाठी ‘श्रमिक विशेष’ रेल्वेगाड्यांची व्यवस्था

केंद्रीय गृह मंत्रालयाचा आदेश

एमपीसी न्यूज – देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींच्या वाहतुकीसाठी रेल्वे मंत्रालयामार्फत विशेष श्रमिक रेल्वेगाड्या चालविण्यास परवानगी देण्याचा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केला आहे. या आदेशानुसार आज (शुक्रवारी) दुपारनंतर काही विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या.

या अडकलेल्या लोकांच्या वाहतुकीकरिता रेल्वे मंत्रालयाकडून राज्य / केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. तसेच तिकिटांच्या विक्रीसाठी आणि रेल्वे स्थानकांवर, रेल्वे फलाटांवर आणि गाड्यांमध्ये पाळावयाचे परस्परांमधील शारीरिक अंतर पाळण्याचे नियम तसेच इतर सुरक्षा उपाययोजनांबाबत रेल्वे मंत्रालय सविस्तर मार्गदर्शक सूचनाही जारी करेल, असे आदेशात म्हटले आहे.

गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजूर, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि अन्य व्यक्तींना त्यांच्या इच्छित स्थळी हलवण्यासाठी  ‘कामगार दिनापासून’ श्रमिक विशेष गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मानक प्रोटोकॉल्‍स अनुसार अशा अडकलेल्या लोकांची ने-आण करण्यासाठी दोन्ही संबंधित राज्य सरकारांच्या विनंतीवरून या विशेष गाड्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालवण्यात येणार आहेत. रेल्वे आणि राज्‍य सरकारानी ‘श्रमिक विशेष’ गाड्या सुरळीत चालवण्यासाठी आणि समन्वयासाठी वरिष्‍ठ अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करावी, असे यात म्हटलें आहे.

प्रवासी पाठवणाऱ्या राज्यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी आणि ज्यांच्यामध्ये लक्षणे आढळणार नाहीत त्यांनाच प्रवासाची परवानगी दिली जाईल. प्रवसी पाठवणाऱ्या राज्यांनी या लोकांना तुकड्या तुकड्यांमध्ये गाड्यांमध्ये बसवून नियोजित ठिकाणी पाठवताना सॅनिटाइज्ड बसेसचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे निकष आणि अन्य सूचनांचे पालन करावे. प्रत्‍येक व्‍यक्तिसाठी मास्कचा वापर अनिवार्य असेल. तसेच जिथून ते निघतील त्या रेल्वे स्थानकावर त्यांची भोजन आणि पाण्याची व्यवस्था तिथल्या राज्य सरकारने करायची आहे.

रेल्वे प्रवाशांच्या सहकार्याने सामाजिक अंतराचे निकष आणि स्वच्छता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न रेल्वे करेल. लांब पल्ल्याच्या मार्गावर प्रवासादरम्यान रेल्वेकडून जेवण पुरवले जाईल.

इच्छित स्थळी पोहचल्यावर राज्य सरकारकडून प्रवाशांना ताब्यात घेतले जाईल. त्यांची तपासणी, गरज भासल्यास विलगीकरण आणि रेल्वे स्थानकावरून पुढील प्रवासाची व्यवस्था केली जाईल. देशावर आलेल्या या संकटप्रसंगी भारतीय रेल्वेचे सर्व अधिकारी आणि  कर्मचारी देशवासियांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि सर्वांचे सहकार्य आणि मदत त्यांना हवी आहे, असे रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.