Statement of Nitin Gadkari : शेतकरी आंदोलनाबाबत नितीन गडकरी यांनी केले ‘हे’ वक्तव्य…

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील 20 दिवसांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलन चालू आहे. याच दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमचे सरकार शेतकऱ्यांना कृषी कायदे योग्य आहेत हे पटवून देईल, समजावून सांगत चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढला जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

नितीन गडकरी यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत हा विश्वास व्यक्त केला असून यामध्ये त्यांनी “जर आपल्याला सांगण्यात आले तर शेतकऱ्यांसोबत चर्चाही करु”, असे म्हटले आहे.

“सध्या कृषी आणि वाणिज्य मंत्री शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात व्यस्त आहेत. जर मला चर्चा करण्यासाठी सांगितलं तर मी नक्कीच त्यांच्याशी संवाद साधेन,” तसेच नवे कृषी कायदे आणून सरकारने शेतकऱ्यांविरोधात काही केलेलं नाही असं सांगताना नितीन गडकरी यांनी सरकार शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी तयार असल्याचे सांगितले आहे.

“जर चर्चाच नसेल तर यामुळे गैरसमज आणि वाद निर्माण होऊ शकतात. चर्चेतून तोडगा काढता येऊ शकतो आणि संपूर्ण प्रकरणच मिटेल. शेतकऱ्यांना न्याय आणि दिलासा मिळेल. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत, मी विदर्भातला आहे, तिथे 10 हजार गरीब शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या मुद्द्याचं राजकारण करता कामा नये. शेतकरी, शेतकरी संघटनांकडून ज्या सुधारणा सांगितल्या जात आहेत त्या योग्य असतील तर बदल करण्यास तयार आहोत,” असेही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच, मला वाटत नाही अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील. आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात काही केलेलं नाही. आपलं धान्य मंडी, व्यापारी किंवा अन्य कुठेही विकणं हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे,” असे सांगत गडकरी यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या आंदोनलावरही भाष्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.