Talegaon Crime News : …अन् पित्यानेच पोटच्या दोन मुलींना ट्रकखाली चिरडले; असा घडला संपूर्ण प्रकार

एमपीसी न्यूज – पित्याने पोटच्या दोन मुलींना ट्रकखाली चिरडून मारले. त्यानंतर त्याने स्वतः चालू ट्रकखाली उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मावळ तालुक्यातील इंदोरी गावात रविवारी (दि. 18) पहाटे एक वाजता घडली.

नंदिनी भरत भराटे (वय 18), वैष्णवी भरत भराटे (वय 14) अशी हत्या झालेल्या मुलींची नावे आहेत. तर मुलींना मारून भरत ज्ञानदेव भराटे (वय 40, सर्व मूळ रा. सावडी, ता. करमाळा, जि. सोलापूर. सध्या रा. अल्फानगरी इंदोरी, ता. मावळ जि. पुणे) याने आत्महत्या केली आहे. सपना भरत भराटे (वय 36) यांनी याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भराटे कुटुंब मागील काही वर्षांपासून इंदोरी गावात राहण्यासाठी आले होते. वस्तीसारख्या असलेल्या परिसरात हे कुटुंब एका पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते. भरतचे चुलत भाऊ आणि अन्य नातेवाईक काही अंतरावर राहत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात पत्र्याच्या घरात गरम होऊ लागल्यास भरत मुलींना हवेशीर वातावरणात फिरायला आणत असे. तो ट्रक चालक होता. त्याच्याकडे एम एच 12 / एच डी 1604 हा 12 चाकी ट्रक होता. त्यावर त्याने मयत थोरली मुलगी नंदिनी हिचे नाव टाकले होते.

भरत याला तीन मुली होत्या. मयत दोन मुलींव्यतिरिक्त 4 वर्षांची लहान मुलगी होती. पती-पत्नी आणि तीन मुलींचे कुटुंब आनंदाने राहत होते. मात्र भरत हा रागीट होता. मागील काही दिवसांपूर्वी मोठी मुलगी नंदिनी हिचे कोणत्यातरी तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावरून भराटे कुटुंबात वादही झाला असल्याचे समोर आले आहे.

भरतची पत्नी इंदोरी येथे एका ठिकाणी कामाला जात होती. शनिवारी (दि. 17) दुपारी चार वाजता नंदिनी कोणत्यातरी मुलासोबत नंदिनी व्हाट्सअपवर चॅटिंग करत असल्याचा संशय भरत याला आला. त्यावरून त्याने नंदिनी आणि वैष्णवी या दोघींना मारले. रात्री सात वाजताच्या सुमारास पत्नी कामावरून घरी आली असता तिला देखील त्यावरून भरत याने बोल सुनावले आणि मुलींना मारल्याचे पत्नी सपना यांना सांगितले.

रात्री जेवण झाल्यानंतर भरत याने एक चिठ्ठी लिहिली. त्यावर सपना यांची जबरदस्तीने सही घेतली. चिठ्ठीतील मजकूर सपना यांना वाचू दिला नाही असेही सपना यांनी पोलिसांना सांगितले आहे.

जेवण करून सर्वजण झोपले. मध्यरात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास भरत झोपेतून उठला. घराबाहेर जाऊन ट्रकची पाहणी करून पुन्हा 10-15 मिनिटांनी परत घरात आला. त्याने नंदिनी आणि वैष्णवी या दोघींना उठवले आणि बाहेर नेले. गरम होऊ लागल्याने मुलींना बाहेर नेले असल्याचा विचार पत्नीने केला. बाहेर नेल्यावर भरत याने मुलींना दम दिला आणि त्यांना ट्रकसमोर झोपवले.

भरतने ट्रक चालू केला. ट्रकचा आवाज ऐकून पत्नी जागी झाली आणि बाहेर आली. त्यावेळी भरत पत्नीलाही ट्रकसमोर येण्यास खुणावत होता. भरतने दोन्ही मुलींच्या अंगावरून ट्रक चालवला. हा प्रकार बघून पत्नी तिच्या चार वर्षांच्या मुलीला घेऊन नातेवाईकांकडे गेली. आरडाओरडा झाल्यानंतर नातेवाईक घटनास्थळी आले असता दोन्ही मुलींसोबत भरत हा देखील रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे दिसले.

मुलींना रस्त्यावर ट्रक समोर झोपवले. त्यानंतर ट्रक सुरू करून ट्रकच्या एक्सीलेटरवर फळी ठेवली आणि भरत याने स्वतः ट्रक समोर उडी मारली. ट्रक अंगावरून गेल्याने मुली चिरडल्या गेल्या. तर भरत याने आत्महत्या केली. ट्रक पुढे जाऊन भिंत तोडून काही अंतरावर जाऊन थांबला. अवघ्या 10 ते 15 मिनिटात हा प्रकार घडला अन होत्याचं नव्हतं झालं.

घटना घडल्यानंतर नातेवाईक घटनास्थळी आले. नंदिनी आणि भरत हे जागीच मृत पावले होते. तर वैष्णवीची हालचाल सुरू होती. चिरडली गेल्याने वेदनेने ती विव्हळत होती. नातेवाईकांनी वैष्णवीला रिक्षात घालून तळेगाव स्टेशन येथील जनरल हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचाही मृत्यू झाला.

भरत याने हा प्रकार करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून त्यात ‘आप्पा आम्हाला माफ कर. माझ्या मुलीने चुकीचे पाऊल टाकले असल्याने आम्ही आत्महत्या करत आहोत. आमचा सर्वांचा अंत्यसंस्कार एकत्र करा. याबाबत कुणालाही दोषी धरू नये.’ अशा आशयाचा मजकूर होता. नंदिनी हिचे प्रेमसंबंध सुरू असल्याची माहिती लहान मुलगी वैष्णवी हिला माहिती असेल तरीही तिने सांगितले नाही, म्हणून भरत याने तिला देखील मारले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ट्रक चालू केल्यानंतरही मुलींनी जीव वाचविण्यासाठी हालचाल का केली नाही? हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरित आहे. पोलीस उपनिरीक्षक आर ए कोळी पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.