Talegaon Dabhade : तब्बल तीन दशकानंतर भेटले कॉलेज सोबती….; जुन्या आठवणींना उजाळा!
एमपीसी न्यूज- इंद्रायणी काॅलेजमध्ये 1983 ते 1987 या कालावधीत वाणिज्य शाखेत शिकून बी.काॅम.पदवी प्राप्त केलेले 35 विद्यार्थी 1987 नंतर तब्बल 32 वर्षानंतर पुन्हा एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
आपल्या वर्गातील मित्र-मैत्रीनींनी वेग वेगळ्या क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कामगिरीची माहिती ऐकल्यावर त्यांना एकमेकांबद्दल परमोच्च आनंद व अभिमान वाटला!
आपापल्या क्षेत्रात नाव कमावलेल्या त्या काळच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एका अविस्मरणीय स्नेहमेळाव्याचे यशस्वी आयोजन केले.
या वर्गातील विद्यार्थी कोणी उद्योजक, तहसीलदार, पोलीस, वकील, चार्टर्ड अकाऊन्टट, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, कंपनीत मोठया हुद्यांवर,बँक अधिकारी अशा विविध क्षेत्रातील विविध उच्चपदावर कार्यरत आहेत.
विशेषतः 90% विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असून त्याकाळी फार दुरवरून पायी चालत येऊन शिक्षण पूर्ण केलेले असल्याने त्या जाणिवेतूनच हा ट्रस्ट स्थापन करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
मागील तीन वर्षांपासून या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले जाते. या स्नेहमेळाव्याला रत्नागिरी, पुणे, हडपसर, मुंबई, मावळ, येथील सोबती मेळाव्यास उपस्थित होते.
हा स्नेहमेळावा रविवारी (दि.1 ) इंद्रायणी काॅलेज व विलास काळोखे यांच्या फार्महाऊसवर संपन्न झाला.1987 साली पदवी घेतलेले हे विद्यार्थी विविध भागांतून खास मेळाव्यासाठी तळेगावी दाखल झाले व वयाची 50 वर्ष पार केलेल्या या मित्रांनी पुन्हा एकदा एक दिवसासाठी काॅलेज जीवनाचा मनमुराद आनंद लुटला.
काॅलेजच्या प्रांगणात सर्व मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. दिवसभर परिचय, गप्पा, शेतात हुळा, हुरडा, काॅलेज जीवनातील आठवणी, गाणी, फिशपाॅण्ड, गंमतीदार खेळ, स्नेहभोजन इत्यादीसह दिवस कसा संपला हे समजले सुध्दा नाही.
उद्योजक विलास काळोखे, भगवान शिंदे, सुरेश शेंडे, मनिषा बोरगांवकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. उपस्थित सर्व मित्र आज समाजातील विविध क्षेत्रात अग्रस्थानी कार्यरत आहेत. उच्चपदावर सक्षमपणे काम करत आहेत आणि या सर्व मित्रांनी वर्षातून एक गेट टुगेदर घ्यायचे व बी.काॅम.87 इंद्रायणी या नावाने ट्रस्ट रजिस्टर करून समाजातील आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व, निराधार लोकांना मदत करणे ही सामाजिक जाणीव ठेवून योजना अमलात आणण्याचे सर्वानुमते ठरले. समाजाप्रती मदतीच्या रूपाने खारीचा वाटा उचलण्याचे ठरले.
काॅलेज सोडून 35 वर्षानंतर विलास काळोखे,भगवान शिंदे,सुरेश शेंडे,राजेंद्र देशमुख, पांडुरंग ठाकर, सोपान जाधव, अविनाश गुरव, नितिन शहा,मनीषा बवरे, विजया भांडवलकर, वर्षा शेळके, मेघा दरेकर, प्रज्ञा दोशी, अरूणा शिंदे, जयश्री हळदवणेकर, सीमा कडू, प्रतिमा पुसाळकर, पिराजी वारिंगे, बाळासाहेब उभे, अरूण काकरे, सतिश जाधव, श्रीकृष्ण टकले, अरूण मोरे, रमेश वाघवले, मिलिंद रेंघे, प्रमोद कुरूंदवाड, अरूण मोरे, रमेश वाघवले, अशोक गाडे, सुर्यकांत म्हाळसकर, रमेश दाभाडे, जयंत संदानशिव आदीमित्र कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
महिला दिनाचे औचित्य साधून 87 परिवारातील सर्व सन्माननीय महिला भगिनींना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व 35 मित्रांनी अथक परिश्रम घेतले व बी काॅम.87 ट्रस्टच्या माध्यमातून सेवाभावी व समाजोपयोगी काम करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.