Talegaon Dabhade : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक; अपक्ष उमेदवार पंढरीनाथ राजाराम ढोरे यांचा ‘शेतकरी विकास’ पॅनेलला जाहीर पाठींबा

एमपीसी न्यूज – श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक सुरु आहे. यात वेळेत माघार न घेता आल्याने तळेगाव- वडगाव गट क्र 3 मधून अपक्ष रिंगणात असलेले उमेदवार पंढरीनाथ राजाराम ढोरे यांनी सर्व पक्षीय शेतकरी विकास पॅनेलला आपला पाठींबा जाहीर केला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी सर्व पक्षीय शेतकरी विकास पॅनेलचे सर्व उमेदवार यांच्या उपस्थितीत आणि कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा तथा नाना नवले यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळे आता केवळ 18 जागांसाठी 29 उमेदवार रिंगणात आहेत.

पंढरीनाथ राजाराम ढोरे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे की, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीकरीता मतदारसंघ क्रमांक- 1 गट क्रमांक 3 तळेगाव- वडगाव या गटातून मी नामनिर्देशन अर्ज दाखल केला होता. परंतु , सदर अर्ज वेळेत मला माघारी घेता न आल्याने तो तसाच राहिला.

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीकरीता माजी खासदार-संस्थापक-अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर झालेल्या श्री संत तुकाराम शेतकरी विकास सर्वपक्षीय पॅनलला माझा पाठिंबा देत आहे, असे पत्रकात ढोरे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर सर्व शेतकरी बंधूनी सर्वपक्षीय पॅनलला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी 211 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 179 उमेदवारांनी माघार घेतल्याने 21 पैकी सोमाटणे पवनानगर गटातील तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे हा संपूर्ण गट बिनविरोध झाला आहे. उर्वरित 18 जागांसाठी 29 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

दरम्यान, तळेगाव-वडगाव गट क्रमांक 3 मधून ऊस उत्पादक शेतकरी म्हणून अपक्ष अर्ज भरलेले पंढरीनाथ राजाराम ढोरे यांनी सर्व पक्षीय पॅनलला आपला पाठिंबा दर्शविला आहे. तसेच याबाबत पाठींब्याचे पत्रही देण्यात आले आहे. साखर कारखाना निवडणुकीसाठी 16 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी छाननीनंतर 211 अर्ज शिल्लक राहिले होते. मंगळवारी (दि. 4 फेब्रुवारी रोजी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. 211 पैकी 179 उमेदवारांनी माघार घेतल्याने 21 पैकी तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 18 जागांसाठी 29 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.