Talegaon Dabhade : विद्यार्थ्यांच्या बदलत्या मानसिकतेनुसार त्यांना घडविण्याचे शिक्षकांसमोर आव्हान- डॉ. प्रभाकर देसाई

इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेत शिक्षकदिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण

एमपीसी न्यूज- बदलत्या काळानुसार विद्यार्थी प्रचंड बुद्धीमान होत चालला आहे. तर दुसरीकडे तो सोशल मीडियाची शिकार बनला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांना घडविण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास व राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी केले.

इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्यावतीने शिक्षकदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी डॉ. देसाई बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार कृष्णराव भेगडे होते. यावेळी संस्थेचे खजिनदार केशवराव वाडेकर, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. बी.बी. जैन, डी. फार्मसीचे प्राचार्य जे.एस. शिंदे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी संस्थेतील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. डी.आर. साबळे, प्रा. एस.पी. भोसले, प्रा. एन. टी. भोसले, सुजाता चव्हाण यांना; तर शिक्षकेतर पुरस्कार एस.एस. तरटे, भक्ती दाभोळकर, राजेंद्र गायकवाड, वाय.डी. काळाणे यांचा सत्कार्यार्थींमध्ये समावेश होता.

डॉ. प्रभाकर देसाई म्हणाले, ” आज शिक्षकांनी केवळ आपल्या विषयाचे ज्ञान न देता विद्यार्थ्यांची सर्वांगीण जडणघडण होण्यासाठी त्याला सर्वज्ञानी बनविणे गरजेचे आहे. महाराष्ट्राला लाभलेला फुले, शाहू, आंबेडकर यांचा वारसा पुढे नेण्याची व महाराष्ट्राचे पुरोगामित्व टिकविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांची आहे”

कृष्णराव भेगडे यांनी सांगितले की मावळ तालुक्यात आज ठिकठिकाणी 65 महाविद्यालये उभी राहिली आहे. विविध विद्याशाखांचे शिक्षण घेण्याची सोय आज विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे. शिक्षकांनी नैतिकता बाळगून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यावे.

आपल्या प्रास्ताविकात इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे म्हणाले, ” महाविद्यालयाचे यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून, विविध उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांनी केरळ पूरग्रस्तांसाठी पाच लाख रुपये निधी संकलित केला. संस्थेने बी. फार्मसी, डी. फार्मसी, वरिष्ठ सायन्स कॉलेज या नवीन शाखा सुरु केल्या आहेत. विद्यार्थ्यांना आधुनिक सोयीसुविधा दिल्या जात आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे”

सूत्रसंचालन प्रा. के.व्ही. अडसूळ यांनी, तर आभार उपप्राचार्य प्रा. एस.एस. ओव्हाळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे प्रा. बी.के. रसाळ, प्रा. डी.पी. काकडे, प्रा. दिप्ती पेठे यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.