Talegaon : कृषी विभागाकडून शेतकरी गटामार्फत बांधावर बियाणे व खते वाटप
एमपीसीन्यूज – नवलाख उंबरे कार्यक्षेत्रात चार गावात राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने शेतक-यांच्या बांधावर शुक्रवारी (दि 22) बी-बियाणे व खते वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या धर्तीवर या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने या योजनेचा प्रारंभ केला आहे. यामध्ये शेतक-यांना उत्तम प्रतीचे बी-बियाणे बांधावर शेतकरी गटाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे व सोबतच बियाणे लागवडी विषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
श्री.बोधलेबुवा शेतकरी गटामार्फत बधलवाडी, मिंडेवाडी, जाधववाडी, नानोली तर्फॆ चाकण येथे खरीप भात पिकाचे बियाणे व विविध खतांचे वितरण करण्यात आले.
या योजने मागचा उद्देश शेतक-यांना गावातून बाहेर पडू न देता कृषीसेवा केंद्रावरील गर्दी कमी करणे, जेणेकरून कोरोना प्रादुर्भाव कमी होईल असे सहाय्यक कृषी अधिकारी प्रियंका पाटील यांनी सांगितले.
मंडळ कृषी अधिकारी व्ही.व्ही.कुलकर्णी, कृषी पर्यवेक्षक डी. डी. तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली हे वाटप करण्यात आले. मावळ तालुक्यात बी-बियाणे व खते शेतकरी गटांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मावळ तालुका कृषी अधिकारी देंवेद्र ढगे यांनी सांगितले.