Talegaon: वैचारिक निबंध स्पर्धेत अमीन खान, शबनम खान, महेश भागीवंत व प्रभाकर तुमकर यांना पारितोषिके
Talegaon: Prizes to Amin Khan, Shabnam Khan, Mahesh Bhagiwant and Prabhakar Tumkar in Essay Competition राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनादिनानिमित्त घेतलेल्या वैचारिक निबंध स्पर्धेत जिल्हा पातळीवर विलास पंढरी व अजित जाधव प्रथम
एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनादिनानिमित्त घेण्यात आलेल्या वैचारिक निबंध स्पर्धेत ज्येष्ठ पत्रकार अमीन खान यांना तालुक्यात प्रथम तर जिल्हास्तरावर उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला आहे. तालुकास्तरावर व्दितीय क्रमांक सामाजिक कार्यकर्त्या शबनम खान, तृतीय क्रमांक महेश सुधाकर भागीवंत यांना तर पत्रकार प्रभाकर तुमकर, माधुरी पवार यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आज (शनिवारी) फेसबुकवरून वैचारिक निबंध लेखन स्पर्धेच्या निकालांची घोषणा केली.
जिल्हा पातळीवर विलास पंढरी व अजित जाधव प्रथम
या स्पर्धेत संख्येने 288 लेखकांनी भाग घेतला होता. जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांक हवेलीच्या विलास पंढरी आणि पुरंदरच्या अजित जाधव यांना विभागून देण्यात आला आहे. व्दितीय क्रमांकासाठी कोणीही नाही. तर तृतीय क्रमांक मुळशीच्या करण सारडा यांना जाहीर करण्यात आला आहे. उत्तेजनार्थ लेखांसाठी परीक्षकांनी मावळचे अमीन खान, वेल्ह्याचे सुरेश कोळी, दौंडची प्रियांका तेली, खेडच्या डॉ.श्रृती गुजराथी आणि आंबेगावच्या दिव्या चिखले यांना निवडले आहे.
मावळ तालुक्यातून अमीन खान यांनी राजकीय विषयावर भाष्य केलेल्या ‘कोरोना क्रांतीचा वेध’ या लेखाची सर्वोत्कष्ट लेखनासाठी प्रथम म्हणून निवड झाली आहे. महिलांच्या जगण्याच्या विषयावर तिला ‘उभारी दिली तर..’ या लेखासाठी शबनम खान यांना व्दितीय क्रमांक देण्यात आला आहे.
शिक्षण विषयावर महेश भागीवंत यांनी लिहिलेल्या लेखास तिसरा क्रमांक मिळाला आहे. प्रभाकर तुमकर यांनी कोरोनाकाळातील पंढरीची वारी या विषयावर लिहिलेल्या लेखास उत्तेजनार्थ पारितोषिक जाहिर करण्यात आले आहे.
जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
सर्व लेखकांचे लेखन हे जिल्ह्याच्या बौध्दिक आणि वैचारिक परंपरेला साजेसे असे होते. ते सर्वसमावेशक आणि भविष्यातील बदलांचा वेध घेणारे आहे. परीक्षक म्हणून डॉ. मेदिनी डिंगरे, डॉ. अशोक गिरी आणि धर्मराज पाटील यांनी खूप परिश्रम घेतले. – प्रदीप गारटकर, आयोजक