Talegaon : सर्वसामान्यांचे दुःख जाणणाराच खरा नेता – नवाब मलिक

बापूसाहेब भेगडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – पूर्वी राजकीय नेते आणि कार्यकर्ते मोजकेच होते. पण ते सर्व निष्ठावान होते. तंत्रज्ञान युगात पैसे आले, त्यामुळे घराघरात स्वयंघोषित नेते झाले. पैशाने कोणीही आमदार, खासदार किंवा नेता होत नाही. त्यासाठी सर्वसामान्यांचे दुःख जाणून त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी त्यांच्यासोबत उभा राहणारा, नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारच खरा नेता असतो, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले.

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नवाब मलिक बोलत होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, ज्येष्ठ नेते सुरेशभाऊ चौधरी, रमेश साळवे, कृष्णा कारके, सविता दगडे, राजश्री म्हस्के, अर्चना घारे, बाळासाहेब जांभूळकर, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, हभप बाळासाहेब काशीद, डॉ. अशोक निकम, हरिश्चंद्र गडसिंग, दीपक हुलावळे, बाबुराव वायकर, शोभा कदम, सचिन घोटकुले, गणेश काकडे, बाळासाहेब भानुसघरे, अंकुश आंबेकर, संभाजी राक्षे, साहेबराव कारके, सुनील दाभाडे, कैलास गायकवाड, सुनील भोंगाडे, संतोष मुऱ्हे, नारायण ठाकर, सुदाम कदम, हेमलता काळोखे, सुनिता काळोखे, मंजूश्री वाघ, शितल हगवणे, ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे, संतोष भेगडे, आनंद भेगडे, अरुण माने, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक जाधव, सचिव संदेश जाधव, विनय भेगडे आदी उपस्थित होते.

तळेगाव दाभाडे मधील तुकारामनगर येथे झालेल्या अभीष्टचिंतन सोहळ्यात माजी राज्यमंत्री मदन बाफना यांच्या अध्यक्षतेखाली, माजी खासदार नानासाहेब नवले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या हस्ते माजी आमदार मावळ भूषण कृष्णराव भेगडे यांना ‘जीवनसार्थक गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मानपत्र, पुणेरी पगडी, शाल व पुष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप होते, तर वाढदिवसानिमित्त बापूसाहेब भेगडे यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

नवाब मलिक म्हणाले, “केंद्रातील सरकारच्या पायावर पाय ठेवून भूलथापा मारण्याचे काम राज्यशासन करीत असून, जाहिरातबाजी करून मिळवलेली सत्ता त्यांच्याकडे राहणार नाही. सर्वसामान्यांना मदत करून प्रत्येकाने आपली पत, प्रतिष्ठा तयार करावी लागते. हीच कार्यपद्धती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनुकरली असून याच बळावर आगामी 2019 च्या निवडणुकीत केंद्रासह राज्यात परिवर्तन होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

बापूसाहेब भेगडे म्हणाले, “नानासाहेब नवले, कृष्णराव भेगडे आणि मदनजी बाफना या त्रिमूर्तींनी आपल्या जीवनाला दिशा व आकार देण्याचे काम केले. पुढे सांप्रदायिक वसा लाभला त्याच मार्गावरून पुढे मार्गक्रमण करण्याचा मनोदय व्यक्त आहे. असे म्हणत त्यांनी शुभेच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

सत्काराला उत्तर देताना कृष्णराव भेगडे म्हणाले, “राजकारण हे समाज सेवेचे साधन असून, नव्या पिढीने हे उत्तरदायित्व स्वीकारून काम केल्यास जनतेची साथ मिळेल. सत्काराबद्दल मी आपला ऋणी आहे.”

नानासाहेब नवले म्हणाले, “आमदार व खासदार यांच्यापेक्षा साखर कारखाना चालविणे फार कठिण काम आहे. राजकीय जीवन धकाधकीचे झाले असून, सामाजिक कार्यात मानसिक स्वास्थ्य मिळते.” नवाब मलिक, मदन बाफना, विलास लांडे, रमेश साळवे, शिव व्याख्याते प्रा.यशवंत गोसावी आदींनी मनोगत व्यक्त करून बापूसाहेब भेगडे यांना शुभेच्छा दिल्या. बापूसाहेब भेगडे यांनी  आगामी मावळ विधानसभेची निवडणूक लढवावी, असा उल्लेख सर्वांनीच भाषणात केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केले. आभार संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अंकुश आंबेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ तळेगाव दाभाडे आणि बापूसाहेब भेगडे मित्रपरिवार यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.