Nigdi : शिक्षकांसमोर अनेक आव्हाने उभे – कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर
एमपीसे न्यूज- बदलते व्यवस्थापन व शासकीय नियम, शिक्षक कमी आणि विद्यार्थी संख्या जास्त अशी अनेक आव्हाने शिक्षकांसमोर उभी आहेत. असे उदगार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांनी निगडी येथे काढले.
द इंटरनॅशनल असोशिएशन ऑफ़ लायन्स क्लब्जच्या रिजन 4-5 आणि चिंचवड मल्याळी समाजम यांच्या संयुक्त विद्यमाने आकुर्डीत आयोजित केलेल्या शिक्षक कृतज्ञता सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय दिघी येथील शिक्षिका वंदना शिवाजी आहेर यांच्यासह शहरातील 35 शिक्षक व 7 शैक्षणिक संस्थाचा गौरव करण्यात आला.
व्यासपीठावर लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा, उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे, द्वितीय उपप्रांतपाल अभय शास्त्री, माजी प्रांतपाल बी.एल जोशी, सीएमएसचे सरचिटणीस टी पी विजयन, के.व्ही जनार्दन, रीजन चेअरमन आनंद मुथा, डॉ. हेमंत अगरवाल, हरिदास नायर आदी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ करमाळकर पुढे म्हणाले की, विद्यार्थ्याला साक्षर करण्यापेक्षा सुशिक्षित करण्याची गरज आहे. संस्काराची जोड दिल्यावर विद्यार्थी सुशिक्षित होईल. मात्र आज मुलांना सुशिक्षित करताना नीतिमूल्यांचा ऱ्हास होत आहे. निस्वार्थी विद्यार्थी घडविणारे शिक्षक उरले नाही. पुण्यात 1760 शाळांमधुन केलेल्या सर्वेक्षणात पालक स्पर्धेत टिकण्यासाठी दर्जात्मक शिक्षण देण्यासाठी धडपड करीत आहे. नीतिमूल्ये कशाशी खातात याचा विसर पालकांना पडला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शाळेत शिक्षक- विद्यार्थी तर घरात पालक- विद्यार्थी यांच्यातील संवाद नाहीसा झाल्याचे निर्देशात दिसून आले. यासाठी पालकांनी देखील स्वतःचे प्रगती पुस्तक तपासायची गरज आहे. शिक्षक बनायला सध्याची तरुण पिढी तयार नाही. शाळेत आरेला कारे करणारे विद्यार्थी तयार होत आहे. यात शिक्षक कुठेतरी कमी पडत असल्याची खंत त्यांनी शेवटी व्यक्त केली.
ओमप्रकाश पेठे म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रात कुशल कामगार मिळत नाही तर एका बाजूला बेरोजगारी आहे. त्यामुळे शिक्षण संस्था औद्योगिक क्षेत्र यांच्यात एक दरी निर्माण झाली आहे. ही दरी कमी करण्यासाठी विद्यापीठ आणि लायन्स क्लबने एकत्रित उपक्रम राबवावा.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलजा सांगळे व दिगंबर ढोकले यांनी केले आभार टी.पी विजयन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजीव कुटे,सरस सिन्हा, प्रशांत कुलकर्णी, सत्येन भास्कर, मनोज बंसल, एस त्यागराजन, विनय सातपुते, आनंद खंडेलवाल, विजय अगरवाल, प्रकाश सुत्रावे यांनी विशेष परिश्रम घेतले.