Mumbai News : वीज कामगारांच्या प्रश्नांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे उर्जामंत्र्यांचे निर्देश

एमपीसी न्यूज – वीज कामगारांच्या प्रश्नांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्या त्वरित सोडविण्याचे निर्देश राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तिन्ही वीज कंपनीच्या व्यवस्थापनास गुरुवारी (दि.28) दिले.

महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस (इंटक) यांच्यासोबत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांवर गुरुवारी (दि.28) डॉ. राऊत यांच्या उपस्थितीत वीज कंपन्यांच्या फोर्ट मुंबई स्थित कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

व्याधी अथवा अपघात यामुळे शारीरिक दृष्ट्या निकामी झालेल्याना स्वेच्छा निवृत्ती, रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा ग्राह्य धरणे, वीज बिल वसुलीसाठी कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचारी यांच्यावर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेणे, अभियांत्रिकी पदवी व पदविका धारक तांत्रिक कर्मचाऱ्यांना कनिष्ठ व सहायक अभियंता या पदावर प्रतिनियुक्ती मिळण्याबाबत, पेन्शन योजना लागू करण्याबाबत, रिक्त पदे भरण्याबाबत व इतर मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. डॉ राऊत यांनी इंटकद्वारे उपस्थित केलेले प्रश्न तपासून निर्णय घेण्याचे निर्देश व्यवस्थापनाला दिले.

स्थानिक दबावात वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे असोत किंवा महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्याना योग्य ती शिक्षा होण्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख, विधी व न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत एक बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे डॉ. नितीन राऊत यांनी यावेळेस सांगितले. उच्च अर्हता धारण करणाऱ्यांना वरिष्ठ पदावर प्रतिनियुक्तीसाठी 15 वर्षाची अट शिथिल करण्याची मागणीही त्यांनी मान्य केली.

या बैठकीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव व महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक असीम गुप्ता, महावितरणचे संचालक मानव संसाधन भालचंद्र खंडाईत, इंटकचे अध्यक्ष व आमदार जयप्रकाश छाजेड व इतर कामगार नेते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.