Pune Crime News : भाईला खुन्नस देण्यावरून टोळक्याचा तरुणावर प्राणघातक हल्ला
एमपीसी न्यूज : मित्रांसोबत गप्पा मारत थांबलेल्या एका तरुणावर सहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने गंभीर वार करत प्राणघातक हल्ला केला आहे. समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सदानंद नगर जवळ सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे.
संकेत आनंद तारू, केतन संजय चव्हाण, हर्षद पवार, नयन ठीले, फय्याज शेख, उदय लोखंडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील संकेत तारू आणि केतन चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी रहिम अल्ताफ कुरेशी (वय 23) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे मित्रासह गप्पा मारत थांबले होते. यावेळी आरोपी संख्येत तारू त्या ठिकाणी आला आणि “मी इथला भाई असताना सुद्धा हा मला नेहमी खुन्नस देतो, हाच तो रहीम कुरेशी हा सुरज ठोंबरे ला भेटत असतो, आज त्याचा खेळ खल्लास करू” असे म्हणून ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने त्याच्यावर वार केला.
फिर्यादीने हा वार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर आरोपी संकेत तारू यांनी पोटावर आणि कमरेवर कोयत्याचा वार करून त्याला गंभीर जखमी केले. फिर्यादीचे मित्र त्याला वाचवण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांनाही कोयत्याने आणि लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली.
समर्थ पोलिसांनी या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटकही केली अधिक तपास सुरू आहे.