Pune : शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर; सात महिन्यात सात हजारांहून अधिक नागरिकांना चावा

एमपीसी न्यूज – शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या दोन लाखाच्या घरात पोहोचली असून, मागील सात महिन्यात शहरातील ७ हजारांहून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे.  

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पुणेकरांच्या पाचवीला पूजल्यासारखी अवस्था आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार गेल्या सात महिन्यांमध्ये तब्बल ७०१६ नागरिकांवर भटक्या कुत्र्यांच्या चाव्यांमुळे रेबिजविरोधी लस घेण्याची वेळ आली आहे. शहराचा वाढता विस्तार, कुठेही टाकला जाणारा कचरा यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या निर्माण झाली आहे.  कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम पालिकेचा आरोग्य विभाग करतो. भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी पालिका प्रशासनातर्फे नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण करण्यात येते.
मात्र, शहरात २ लाख भटकी कुत्री असताना अवघ्या १० हजार कुत्र्यांवर दरवर्षी नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येते. त्यामुळे कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवणे कठीण जात आहे. प्रत्येक महिन्याला सर्वसाधारण १००० नागरिकांना कुत्री चावत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. भटकी कुत्री चावण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत दुप्पट झाले आहे. २००५ मध्ये शहरातील ९ हजार १४५ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला होता. तर २०१५ मध्ये हेच प्रमाण १८ हजार ५६७ वर जाऊन पोहोचले होते. जानेवारी ते डिसेंबर २०१७ या वर्षात हे प्रमाण १० हजार ३४०  होती ती २०१८ मध्ये ९१३४ इतकी झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.