Maharashtra News : मराठा आरक्षण बाबत राज्य सरकार बोलत एक आहे आणि करत एक : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : मराठा समाजाला आरक्षण देऊन‌ आपल्या युवकांचे भविष्य सुरक्षित करणे हे आपल्या राज्यासमोरील मोठे आव्हान आहे. शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. एमपीएससी परीक्षा होत नाही आहे . आणि हे सर्व केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे होत आहे. राज्य सरकार बोलत एक आहे आणि करत एक आहे. अशी टिका भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टिवीट द्वारे केली आहे.

 

पाटिल म्हणाले, आपल्या भवितव्यावर टांगती तलवार आहे. हे पाहून काही तरुण टोकाचा निर्णय घेत आहेत. आज सुप्रीम कोर्ट मध्ये जी काही घटना घडली त्यावरून एकच विचार डोक्यात येतो .इतका संवेदनशील विषय असून देखील राज्य सरकार इतके बेजबाबदारपणे कसे काय वागू शकते ?तात्पुरती स्थगिती उठवण्यात संदर्भातली सुनावणी अचानक ठरलेली नव्हती. ती पूर्वनियोजित होती. तरी देखील इतक्या महत्वाच्या विषयासंदर्भातील सुनावणीदरम्यान राज्य सरकार तर्फे नेमण्यात आलेला वकील गैरहजर असणे याहून दुसरे बेजबाबदारपणाचे उदाहरण शोधून सापडणार नाही.

तांत्रिक अडचणींमुळे वकील गैरहजर राहिला असे बाळबोध स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिले. त्यांच्या स्पष्टीकरणावरुन आणि एकंदरीत कारभारावरून त्यांना मराठा समाजाप्रती किती आत्मीयता आहे हे दिसून येते. आपण सर्व भूतकाळात जेंव्हा डोकावतो तेंव्हा समजते की काँग्रेसला कधीही मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते आणि आताही द्यायचे नाही. सुनावणी दरम्यान वकील उपस्थित नसणे हा त्याच एका कटकारस्थानाचा भाग आहे परंतु जनता सुजाण आहे ती असल्या कटकारस्थानांना कधीच बळी पडणार नाही. असे पाटील म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.