IPL 2021 : कोरोनाच्या सावटाखाली आजपासून ‘आयपीएल’चा थरार

52 दिवस 60 सामने 

एमपीसी न्यूज – ‘आयपीएल’च्या 14 व्या पर्वाची आजपासून (शुक्रवार, दि.09) सुरुवात होत आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात मोसमाचा पहिला सामना रंगणार आहे. 52 दिवस 60 सामने खेळवले जाणार असून, 14 व्या पर्वावर देखील कोरोनाचे सावट आहे. 

कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी बीसीसीआयने एप्रिल-मे महिन्याऐवजी सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे ‘आयपीएल’च्या 13व्या हंगामाचे आयोजन केले. यावर्षी ही स्पर्धा पुन्हा मायदेशी परतली असली स्पर्धेवर कोरोनाचे सावट कायम आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून जैव-सुरक्षित वातावरणात प्रेक्षकांविना ‘आयपीएल’चा थरार रंगणार आहे.

चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर होणाऱ्या सलामीच्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली प्रथमच विजयी सलामी नोंदवण्यासाठी मुंबई उत्सुक आहे. तर दुसरीकडे चेपॉकवरील खराब कामगिरीला पुसून टाकण्याचे ध्येय विराट कोहलीच्या बेंगळूरुचे असेल.

52 दिवस आयपीएलचे 60 सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये 56 साखळी सामने आणि चार प्लेऑफ असतील. मुंबई, चेन्नई, दिल्ली, बंगळुरू, कोलकता आणि अहमदाबाद या सहा ठिकाणी हे सामने खेळवले जातील. अंतिम सामना व प्लेऑफचे सामने अहमदाबाद मध्ये खेळवले जातील.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या), वेळ : सायंकाळी 7.30 वा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.