Pune : दिलेला शब्द आणि ठरलेली वेळ नेहमी पाळलीच पाहिजे – बाबासाहेब पुरंदरे

एमपीसी न्यूज – दिलेला शब्द आणि ठरलेली वेळ नेहमी पाळलेली पाहिजे, सल्ला महाराष्ट्र भूषण व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दिला.

पुणे महापालिका मराठी भाषा संवर्धन समिती, साहित्यिक कट्टा वारजे आयोजित शरद जतकर यांच्या “अमात्य हेग्रीस मलयकेशीराज” या कादंबरीचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र भूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक न. म. जोशी होते. गंगाबाई धुमाळ बालोद्यान व विरंगुळा केंद्र, ईशाननगरी शेजारी वारजे येथे हा कार्यक्रम आज रात्री सात वाजता झाला. ज्येष्ठ साहित्यिक माधवी वैद्य, नगरसेविका दीपाली धुमाळ, पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, शैलेजा जतकर, सचिव डी. के. जोशी, उदय कुलकर्णी, गोपाल कुलकर्णी, जयंत मोहिते, सई जतकर यावेळी उपस्थित होते. प्रणव जतकर यांनी सूत्रसंचालन केले. बाबा धुमाळ यांनी आभार मानले.

बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, ही कादंबरी वाचाच. ही अतिशय महत्वपूर्ण आहे. मराठी भाषेत वाङमयाचे वेगवेगळे प्रयोग झाले पाहिजे. त्यामुळे मराठी भाषा समृद्ध होईल. ही कादंबरी गूढच आहे. मराठी शैलीतील चांगले पाऊल आहे. माझं वय 98 असून मी 70 वर्ष झाले व्याख्यान देतो. त्यामध्ये 8 हजार व्याख्यान दिले. पण, वेळ कधीही चुकू दिली नाही, असेही बाबासाहेब यांनी निक्षून सांगितले. शहाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांना साहित्याची चांगली जाण होती, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

न. म. जोशी म्हणाले, बाबासाहेब आणि जतकर यांची पुस्तके वाचली गेली पाहिजे. इतरांपर्यंतही ही पुस्तके जावी. वाचाल तर वाचाल! वाङमयीन अपत्याला बंधन नसते. आपले हे पहिलेच पुस्तक असल्याने इतर पुस्तकांचे लिखाण व्हावे. तर, पुढील कार्यक्रमादरम्यान वेळ नक्की पाळणार असल्याचे आश्वासन बाबा धुमाळ यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.