Nigdi : …तर भारताने संपूर्ण जगावर राज्य केले असते – महेश लांडगे
एमपीसी न्यूज – महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह व छत्रपती शिवाजी महाराज हे दोन महापुरुष एकाच युगात जन्मले असते. तर, भारताने संपूर्ण जगावर राज्य केले असते, असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले. महाराणा प्रताप हे शूर योद्धा होते. त्यांनी घालून दिलेला आदर्श जोपासला पाहिजे, असेही ते म्हणाले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त निगडी येथील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या या कार्यक्रमास सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, ‘फ’ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, ‘अ’ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसदस्या सुमन पवळे, कमल घोलप, नगरसदस्य प्रा.उत्तम केंदळे, माजी स्वीकृत सदस्य जितेंद्र पवार, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, नायब तहसिलदार एन.टी.परदेशी, राजपूत समाज संघठन पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष शिवकुमारसिंह बायस, जयसिंह राजपूत, कैलाससिंह चौहान, विजयसिंह राजपूत, श्रीराम परदेशी, दिनेश राजपूत, सुरेश सुर्यवंशी, नारायण चंदेल, तुलसीदास राजपूत, दर्शना राजपूत, विक्रमसिंह राजपूत, अशोकसिंह इंगळे, किरण परदेशी, प्रविणसिंह राजपूत आदी उपस्थित होते.
महापौर राहूल जाधव म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड ही कष्टक-यांची नगरी, औद्योगिकनगरी आहे. यामध्ये विविध जाती – पातींचे लोक आनंदाने राहातात. सर्व समाजाला अभिप्रेत असलेले काम केले पाहिजे. माणुसकी हीच एक जात म्हणून सर्वांनी एकत्र येऊन विकासांची कामे केली पाहिजे. महाराणा प्रतापसिंह यांचा कालखंड पाहिल्यास अपार कष्ट व मेहनत घेऊन ते देशासाठी लढले. यामध्ये हल्दीघाटीचे युद्ध हे स्मरणीय आहे. महाराणा प्रताप यांनी अन्न पाण्यावाचून लढून देशासाठी एक आदर्श निर्माण केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माहिती व जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपीक रमेश भोसले यांनी केले. तर आभार मुकेश राजपूत यांनी मानले.