Mumbai : पुणेकरांना दोन्ही वेळ पाणी मिळणार – पालकमंत्री गिरीश बापट

एमपीसी न्यूज –  पुणे शहराला आगामी काळात दोन्ही वेळ पाणीपुरवठा होईल. सध्यातरी पाणी कपात करण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. उलट टेल टू हेड सर्वांना समान पाणीवाटप करण्याचे निश्चित झाले आहे. अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी कालवा समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांना दिली.

पुण्यातील नियोजित पाणी कपातीच्या बातम्या निराधार आहेत. त्यावर कुणीही विश्वास ठेऊ नये असे आवाहनही बापट यांनी केले. ते म्हणाले की धरणाच्या कार्यक्षेत्रात कमी पाऊस झाल्याने यंदा पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी आम्ही टाॅप टू बाॅटम पद्धतीने कालव्यातील पाण्याचे वितरण करणार आहोत. शेती व पिण्यासाठी पुरेसे पाणी राखून ठेवण्याचे योग्य नियोजन करीत आहोत. पाण्याची बचत करून आत्तापासून नियोजन करावे. असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

येत्या काही दिवसात आणखी पाऊस झाल्यास परिस्थितीत थोडा बदल होईल. तथापि सद्यस्थितीत अडीच टीएमसी एवढा पाणीसाठा कमी आहे. बेबी कालव्याची पाणी उचलण्याची क्षमता वाढवून पुणे महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करावा.अशा सूचना महापालिकेला आज देण्यात आल्या. टेल टू हेड सर्वांना पाणीवाटप करावे. ते करतांना शेतकरी समाधानी रहावा व पुणे शहरालाही पिण्याचे पाणी द्यावे. याची दक्षता घ्यावी. अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली.खडकवासला, पवना, चासकमान, भामा आसखेड, व नीरा जलाशयातील पाणी साठा. सिंचनक्षमता व सद्यस्थिती याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

पाणी टंचाई गृहित धरून पुणे महापालिकेने दररोज 1350 एमएलडी ऐवजी 892 एमएलडी वापरावे. असा प्रस्ताव पाटबंधारे खात्याने सादर केला होता. पुणे महापालिकेतर्फे पाण्याचा वापर वाढत आहे. 2017-18 या वर्षात 18.71 टीएमसी पाणी महापालिकेने वापरले. तर नोव्हेंबर ते मार्च या पाच महिन्यात पिण्याच्या पाण्याचा वापर वाढला आहे. तशातच टेमघर दुरूस्तीचेही काम चालू असल्याने 1.75 टीएमसी पाणी साठा कमी आहे. अशी माहिती पाटबंधारे खात्याकडून या बैठकीत देण्यात आली. त्यावर चर्चा होऊन पाणी काटकसरीने वापरा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या.

बापट पुढे म्हणाले की खरीप हंगामाचे पहिले आवर्तन संपले असून दुसरे आवर्तन 18 सप्टेंबर रोजी सुरू झाले आहे.
त्यातून शेतीला पुरेसे पाणी द्यावे. असा शासनाचा प्रयत्न आहे. पाणीपट्टी व भाडेपट्टीच्या थकबाकीचाही विषय या बैठकीत चर्चिला गेला. पुणे महापालिकेकडे 270.79 कोटी रूपयांची थकबाकी आहे. त्यापैकी 195.70 कोटी रूपये पाणीपट्टी आहे. ती येत्या पंधरा दिवसात भरण्याचे आश्वासन पालिकेतर्फे देण्यात आले. तसेच साखर कारखान्यांकडून सुमारे 204 कोटी रूपये थकबाकी आहे. अशी माहिती पाटबंधारे खात्याने दिली. या रकमेचा भरणा करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या.

कालव्यातून बेकायदा पाणी खेचणा-यांविरूध्द चोरी करणा-यांविरूध्द कडक कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच पाणी वाटप सोसायटी कायदा अनिवार्य करावा असे ठरले. कालव्यांचे अस्तरीकरण सुरू करावे असे आदेश प्रशासनाला देण्यात आले.

जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, आमदार अजित पवार, बाबुराव पाचर्णे, राहूल कूल, मेधा कुलकर्णी, बाबा भरणे, पालिका आयुक्त सौरभ राव या बैठकीला उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.