Thergaon : केजुबाई बंधारा येथे जलपर्णीचा विळखा, जलचरांचे जीवन धोक्यात !

नदीत थेट जाणारे सांडपाणी थांबविण्यावर प्रशासनाचा कानाडोळा

एमपीसी न्यूज – थेरगाव येथील केजुबाई बंधारा ते थेरगाव गणपती विसर्जन घाट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली आहे. यामुळे पाण्याच्या ऑक्सिजनची पातळी खालावली असून नदीमधील जलचर सृष्टी, मासे आणि इतर जलचर प्राणी यांचे जीवन धोक्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी यामुळेच मासे मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडल्याचे आढळले होते. नदीत थेट जाणारे सांडपाणी थांबविण्याकडे प्रशासन कानाडोळा करत असल्यानेच पवना नदीची गटारगंगा झाली असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आरोग्य, पर्यावरण विभागाने याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम महापालिकेने निविदेद्वारे काढले आहे. संबधित ठेकेदाराला जास्तीच्या रकमेची निविदा काढली गेली आहे. मात्र गेले तीन वर्षे शहरातील पर्यावरणवादी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम आजही अविरतपणे चालू आहे.

ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात येणारी जलपर्णी काही प्रमाणात कमी झाली आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत जलपर्णीने नदी व्यापली नाही, असे असतानाही तिन्ही नद्यांचे जलपर्णी काढण्यासाठी दोन कोटीची निविदा काढण्याचे कारण काय? ही करदात्यांच्या पैशाची लूट नाही का? संबधित ठेकेदाराला आदेश देऊनही ठेकेदराने काम सुरू केले नाही. मग प्रशासन जलपर्णी पावसाने वाहून जाण्याची वाट पाहत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गेले तीन वर्षे अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने नदीतील जलपर्णी काढण्याचे काम स्वयंसेवी संस्थेमार्फत सुरु आहे. स्वतःचा निधी वापरून अतिशय चांगले काम पवना नदीवर केले जात आहे. असे असताना प्रशासनाची उदासीनता दिसून येते. केजुबाई बंधारा येथील जलपर्णी लवकरात लवकर काढण्याचे काम महापालिकेने करावे अशी मागणी होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.