Nashik News : चक्कर येऊन 3 दिवसात 13 जणांचा मृत्यू, तर एका दिवसांत 9 जणांचा
एमपीसी न्यूज : कोरोनामुळे राज्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली असून आरोग्य व्यवस्था मोडकळीस आली आहे. रुग्णांना बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन अशा आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी राज्यभरातून समोर येत आहेत. अशातच नाशिकमधून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरात एकाच दिवशी 9 जणांचा चक्कर आल्याने मृत्यू झाला आहे. तर गेल्या 3 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
चक्कर आल्याने नाशिक शहरात गुरुवारी 9 जण दगावले. दोन दिवसांपूर्वी देखील एकाच दिवसात चक्कर आल्याने 4 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे चक्कर येऊन मृत्यू झालेल्यांची संख्या 3 दिवसात 13 जणांवर पोहोचली आहे. नाशिकमधील या नव्या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात देखील आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर चक्कर येणे, मळमळ होणे यासह कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष नको, असा सल्ला शहरातील तज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना दिला आहे. या मृत्यूंमागे वाढते तापमान हे कारण आहे की आणखी कोणत्या घटकामुळे अशी परिस्थिती निर्माण होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता आणखी खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.