Aditya Thackeray : हे तर गलिच्छ राजकारण, पण मी संयम बाळगलाय – आदित्य ठाकरे
This is dirty politics, but I have exercised restraint - Aditya Thackeray.
एमपीसी न्यूज – सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. हे गलिच्छ राजकारण आहे. या प्रश्नी मी आजही संयमानेच वागत आहे, पण अशा प्रकारे चिखलफेक करून सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल, या भ्रमात कोणी राहू नये, अशी स्पष्ट भूमिका युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली आहे.
कोरोना संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्राचे सरकार ‘कोरोना’चा पराभव करण्यासाठी शर्थ करत आहे.
बहुधा महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरून जी चिखलफेक सुरू आहे ती एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे.
मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
हे तर गलिच्छ राजकारण pic.twitter.com/SvvBtU6qHC
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 4, 2020
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बॉलीवुड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे.
त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत. हा काही गुन्हा नाही. सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू दुर्दवी तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत व महाराष्ट्राच्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे.
पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे.
या प्रकरणाची कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी, पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. याप्रश्नी मी आजही संयमानेच वागत आहे.
अशाप्रकारे चिखलफेकी करून सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कोणी राहू नये असं स्पष्ट मत आदित्य ठाकरे यांनी पत्रात मांडले आहे.