Talegaon : अटलजींना काव्यकुसुमांजलीद्वारे श्रद्धांजली
एमपीसी न्यूज – प्रथम मासिक स्मृती दिनी देशातील हजारो साहित्यकाव्य मंचांवरून काव्याद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा स्तुत्य उपक्रम तळेगाव दाभाडे येथील कलापिनी साहित्य काव्य मंचावर कलापिनी साहित्य काव्यमंच, साप्ताहिक अंबर आणि मावळ विकास प्रतिष्ठान या संस्थांच्या योगदानामुळे संपन्न झाला.
या काव्यकुसुमांजली कार्यक्रमातून अटलजींवर हिंदी आणि मराठीतून कविता आणि गीते सादर करण्यात आली तसेच अटलजींच्या साहित्यिक प्रवासाचा आढावा घेत त्यांच्या गाजलेल्या कवितांची पार्श्वभूमी उलगडत त्याचा रसास्वाद घेत कार्यक्रम रंगत गेला.
कार्यक्रमाचा आरंभ प्रतिमा पूजन आणि मौन पालनाने झाला. विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले, साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकरांनी या उपक्रमाची माहिती दिली आणि कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांनी सर्व कवींना शुभेच्छा दिल्या.
तद्नंतर तळेगावतील आमंत्रित कवींच्या ओघवत्या शब्दनादातून ओजस्वी, उदात्त विचारांनी देशप्रेम आणि शांतरसाने सभागृह भारले गेले. सर्व कवींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. किरण परळीकर यांनी संपूर्ण वंदेमातरम् गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.
कांचन सावंत यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनामुळे कार्यक्रमात रंगत आली. या कार्यक्रमाचे ध्वनिसंयोजन प्रतीक मेहता, काव्यमंच सजावट व बैठक व्यवस्था अशोक बकरे आणि ऋत्विक पाटील यांनी केली. ज्योती गोखले आणि सायली रौंदळ यांनी सहाय्य केले.