Entertainment News : तुझ्यात जीव रंगला’ घेणार प्रेक्षकांचा निरोप

एमपीसी  न्यूज : झी मराठी वाहिनीवरील विशेष गाजलेली आणि अफाट लोकप्रियता मिळवलेली ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. पण लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मालिकेच्या प्रेक्षकांचा हिरमोड झालाय. या मालिकेच्या जागेवर प्रेक्षकांना लवकरच नवी मालिका पहायाला मिळणार आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील पाठकबाई आणि राणादाच्या भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडल्या. झी मराठी वाहिनीवरील सुपरहिट मालिकांमध्ये ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेत पाठकबाईची भूमिका साकरणाऱ्या अभिनेत्री अक्षया देवधरने इन्स्टाग्रामवर राणादासोबतचा एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोमध्ये पाठकबाई आणि राणादा एका नदीच्या काठावर बसलेले दिसत आहेत. हा फोटो पोस्ट करत अक्षयाने कॅप्शनमध्ये ‘गोष्टी संपतात पण आठवणी कायम टिकतात!’ असे म्हटले आहे.

अक्षया देवधरने पोस्ट केलेल्या या फोटोला तिच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे. या पोस्टला ३२ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून अनेकांनी कमेंट्समध्ये ‘आम्ही सुद्धा तुम्हाला मिस करू’, असे म्हटलेय. तुझ्यात जीव रंगला ही मालिका ऑक्टोबर २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अल्पावधितच या मालिकेच्या माध्यमातून पाठकाबाई आणि राणादाने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.

तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या जागी नवी दुसरी मालिका सुरु होणार आहे. २ नोव्हेंबरपासून ‘कारभारी लय भारी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. याला देखील प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेमध्ये ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील निखील चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.