Unlock News: दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरे व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली

नियम व शिस्तीचे काटेकोर पालन करा – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज – दिवाळी पाडव्यापासून (सोमवार) राज्यातील सर्व मंदिरांसह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय अखेर राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत घोषणा केली. हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या लॉकडाऊनमध्ये देशभरातील मंदिरे व सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे देखील भाविकांसाठी बंद करण्यात आली. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने बहुतेक सर्व गोष्टींना परवानगी देण्यात आली. केंद्र शासनाने परवानगी दिल्यानंतरही राज्यातील मंदिरे मात्र बंदच ठेवण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली होती. राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यासाठी आंदोलनेही झाली. अखेर ठाकरे सरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, “दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासूर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर करोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मियांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच.”

एमपीसी न्यूज – अंतरंग दिवाळी अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा

करोनाच्या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे, हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील, असे भावनिक आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

एमपीसी न्यूज – अंतरंग दिवाळी अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.