Vande Bharat Express : ‘वंदे भारत’च्या प्रवाशांना जेवणात मिळणार उकडीचे मोदक

एमपीसी न्यूज – ‘वंदे भारत एक्सप्रेस’ (Vande Bharat Express) या रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जेवणात उकडीचे मोदक मिळणार आहेत. ही सेवा गणेशोत्सवात दोन दिवस उपलब्ध असणार आहे, अशी माहिती इंडियन रेल्वे केटरिंग ॲण्ड टुरिझम महामंडळाने (आयआरसीटीसी) दिली आहे.
महाराष्ट्र राज्यात सध्या मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर, मुंबई-मडगाव, नागपूर-बिलासपूर आणि मुंबई सेंट्रल-गांधीधाम या पाच मार्गांवर वंदे भारत रेल्वे धावत आहेत. या रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आयआरसीटीसी कडून जेवणात उकडीचे मोदक दिले जाणार आहेत. त्यसाठी आयआरसीटीसी कडून साडेचार हजार मोदकांची ऑर्डर देण्यात आली आहे. तर काही मोदक आयआरसीटीसी किचनमध्ये देखील बनवले जाणार आहेत.
हे नियाजन गणेश चतुर्थी (मंगळवार, दि. 19) आणि दुसऱ्या दिवशी (बुधवारी, दि. 20) असणार आहे. गणेश भक्तांना प्रसाद म्हणून आयारसीटीसी कडून मोदक दिले जाणार आहेत. तिसऱ्या दिवशीपासून मोदक मिळणार अथवा नाही, याबाबत आयआरसीटीसी कडून कोणतीही भूमिका मांडण्यात आलेली नाही.
याबरोबरच गणेशोत्सव कालावधीत कोकण रेल्वेच्या काही गाड्यांमध्ये देखील मोदक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याचा रेल्वेच्या मेनूकार्डमध्ये समावेश केला जाणार आहे. मुंबई आणि परिसरातून कोकणात गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जात असतात. त्यांच्या आनंदात वाढ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आयआरसीटीसी कडून सांगण्यात आले आहे.