Kalewadi : वडापावच्या गाडीवरून वाकडमध्ये तरुणाचा खून; तीनजण पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – वडापावच्या गाडीवरून वाकडमध्ये एका तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 19) रात्री घडली आहे.

शुभम जनार्धन नखाते (वय 30, रा. साईबाबा मंदिर, तापकीर चौक, काळेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील, अविनाश भंडारी, प्रवीण धुमाळ (सर्व रा. साईबाबा मंदिर, तापकीर चौक, काळेवाडी) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील 15 दिवसापूर्वी वडापावच्या गाड्यावरून मयत शुभम आणि आरोपी यांच्यामध्ये भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून त्यांच्यात बुधवारी (दि. 19) दुपारी साडेचार वाजता पुन्हा भांडण झाले.

बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपींनी मयत शुभम याला तापकीर चौकातील धुंडिराज मंगल कार्यालय येथे गाठले. शुभमच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार केले. त्यातच शुभमचा मृत्यू झाला.

पोलिसांना माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. मयत शुभम याच्यावर विनयभंग आणि पोक्सोचा गुन्हा दाखल आहे.

वाकड पोलिसांनी गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर रूटमार्च काढला होता. त्याच दिवशी हा खुनाचा प्रकार घडला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.