Weather report: राज्यात वैशाख वणव्याची धग, उकाडा आणखी वाढणार

एमपीसी न्यूज : कमी दाबाचे पट्टे आणि हवेच्या चक्रीय स्थितीमुळे राज्याच्या सर्वच विभागांत आठवडाभर पावसाळी वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather prediction) वर्तविला आहे. तर काही भागांत दुपारपर्यंत निरभ्र आकाश आणि त्यानंतर अंशत: किंवा सामान्यत: ढगाळ स्थिती राहील, असा अंदाज आहे. 

तर दुसरीकडे या कालावधीत दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. दक्षिणेपासून मध्य प्रदेशाच्या दरम्यान कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन त्याचप्रमाणे हवेच्या चक्रीय स्थितीचा परिणाम म्हणून गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाचे सावट आहे. गेल्या काही दिवसांत राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडला आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली होती. राज्यातील पावसाळी वातावरण आणि मेघगर्जनेसह पावसाचे सावट आणखी आठवडाभर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कोकणात तुरळक पावसाची शक्यता

कोकण विभागात आणखी एक दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून 9 मे पर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मात्र 9 मेपर्यंत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याचा वारा वाहून हलक्या पावसाचा अंदाज आहे.

मुंबईत वैशाख वणव्याची धग

मुंबई शहर आणि उपगनरांमध्ये आतापासूनच वैशाख वणव्याचे चटके बसू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांत मुंबईतील तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पुढील आठवड्यात तापमान 36 अंशांच्या पुढे जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणखी उकाडा सहन करावा लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.