दहावीनंतर पुढे काय ?… कलचाचणी व अभिरुची चाचणी (भाग तिसरा)

एमपीसी न्यूज- जूनच्या पहिल्या आठवड्यात इयत्ता दहावीचे निकाल जाहीर होतील. निकालानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता असते ती करियर निवडीची. कोणते करियर निवडावे याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमावस्था असते. कारण योग्य करियरची निवड ही विद्यार्थ्याला यशाच्या मार्गावर नेते तर चुकीचे करियर निवडल्यास विद्यार्थ्यांमध्ये निराशा निर्माण होते. शिवाय आयुष्यातील महत्वाची वर्षे वाया जातात. म्हणूनच एमपीसी न्यूज घेऊन येत आहे करियर निवडीवर मार्गदर्शन करणारी मालिका ‘दहावीनंतर पुढे काय ?’ यामध्ये मानसशास्त्रतज्ञ, करिअर मार्गदर्शक व समुपदेशक डॉ. समिता प्रशांत चव्हाण या मार्गदर्शन करणार आहेत.

करिअर निवडीसाठी- कलचाचणी (Aptitude Test) व अभिरुची चाचणी (Interest Test)

आपण नक्की काय करू शकतो आणि भविष्यकाळाच्या दृष्टीने काय करणे योग्य असेल हे समजून घेण्यासाठी मदत करणारे वस्तुनिष्ठ साधन म्हणजे कल मापन चाचणी होय. कल चाचणी शक्यतो दहावीच्या परीक्षेनंतरच करावी याचं एक महत्वाचं कारण म्हणजे त्यानंतरच मुलं करिअर बद्दल खरोखरच खूप गंभीरपणे विचार करायला लागतात. साधारण सोळाव्या वर्षांनंतर मुलं जास्त स्वविश्लेषणात्मक विचार करू लागतात, ज्याचा या चाचणीतून पडताळा येतो. दुसरं कारण म्हणजे दहावी ही आपल्या शिक्षण व्यवस्थेत करिअर निवडीसाठीची पहिली पायरी आहे, ती ओलांडल्याशिवाय पुढील शाखा निवड करताच येत नाही.

कल चाचणी वरून विद्यार्थ्यांच्या क्षमता व कल मोजले जातात. त्यामधून विद्यार्थ्यांची बलस्थाने व उणिवा कळतात. कल चाचण्या ह्या संशोधनाअंती तयार केलेल्या असतात. यात अनेक छोट्या छोट्या उपचाचण्या असतात. काही बौद्धिक क्षमता मोजणाऱ्या, तर काही विविध व्यावसायिकांना लागणाऱ्या व्यक्तिमत्व गुणांचे मापन करणाऱ्या असतात. काही चाचण्यांमध्ये अनेक प्रकारच्या विचार कौशल्यांची पडताळणी होते; आणि मग या सर्वांच्या संकलित निष्कर्षावरून आपल्या करिअर निवडीला जास्त नेमकेपणा आणता येतो. पण, अर्थातच त्यासाठी करिअर मार्गदर्शक व समुपदेशकाची गरज असतेच. ते मानसशास्त्रीय आणि व्यक्तिमत्व जडण घडण विषयक आलेख काढून देतात. चाचणीतील निष्कर्ष जेव्हा पालक आणि मुलांना नीट समजावून सांगतात, त्यांच्या बारीक सारीक शंकांचे समाधान करतात, तेव्हाच कल चाचणीचे उद्दिष्ट खऱ्या अर्थाने साध्य होते.

सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे अशा चाचण्यांमधून पुढील यशाबद्दलचा एक बऱ्यापैकी वस्तुनिष्ठ अंदाज बांधता येतो. एखादी विद्याशाखा आपल्या ‘कल मापना’ च्या आधारावर निवडल्यामुळे चुकत चुकत दुरुस्त होण्यात वाया जाणारा वेळ अधिक नेमकेपणाने, जास्त सत्कारणी लावता येतो. विद्यार्थी आणि पालक दोघांच्या मनातील अनिश्चितता, गोंधळ कमी होतो.

अभिरुची मापन (Interest Test) चाचणीने विद्यार्थ्यांची आवड निवड (Liking-Disliking) मोजली जाते. परंतु सध्या याबाबत गोंधळ दिसतो आहे. काहीजण कलचाचणीला परीपूर्ण मानतात तर काही अभिरुची चाचणीला परीपूर्ण मानतात. या चाचण्यांमधला समतोल राखत नाहीत. एखाद्या व्यक्तीची एखाद्या विषयात/क्षेत्रात क्षमता आहे परंतु आवड नाही तर तो त्या क्षेत्रात जास्त काळ रमू शकणार नाही. तसेच एखाद्या व्यक्तीला एखाद्या विषयात आवड आहे परंतु त्या विषयात क्षमता नसेल तर तो त्या क्षेत्रात यशस्वी करिअर करू शकत नाही. म्हणून करिअरचे क्षेत्र निवडतांना Aptitude Test आणि Interest Test दोन्ही चाचण्यांतून संकलित केलेल्या निष्कर्षावरून करिअर निवडीला नेमकेपणा आणता येतो. म्हणूनच कल मापन व अभिरुची मापन चाचणींना एका नाण्यांच्या दोन बाजू म्हणतात. मुलांना त्यांच्या क्षमता, आवडी-निवडी आणि कल योग्य वयात कळल्या, तर त्याचा त्यांना भविष्यात नक्कीच फायदा होतो.

मार्गदर्शक-
डॉ. समिता प्रशांत चव्हाण
मानसशास्त्रतज्ञ, करिअर मार्गदर्शक व समुपदेशक
पत्ता-
संकल्प: ए सेंटर फॉर कॉम्पिटेन्सी असेसमेन्ट
322, गुरूदत्त अपार्टमेंट, दुसरा मजला, विठ्ठल मंदिर जवळ, नवी पेठ, पुणे-३०
मो.- 7028896981/82

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.