Wakad : पाण्यासाठी न्यायालयात याचिक दाखल करणार
एमपीसी न्यूज – मागील पाच वर्षांपासून पाणी मिळत नसल्याने वाकड परिसरातील गृहनिर्माण सोसाट्यांमधील नागरिकांनी ‘पाणी नाही, मतदान नाही’ हे अभियान सुरु केले आहे. आता पाण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली जाणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड फेडरेशनचे सुदेश राजे म्हणाले, वाकड परिसरातील अनेक गृहनिर्माण सोसाट्यांना अत्यंत कमी पाणी मिळत आहे. मागील चार वर्षांपासून ही पाण्याची समस्या आहे. पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागतात. टँकरचे पैसे भरणे नाकीनऊ येत आहे. आम्हाला पाणी द्या एवढीच आमची माफक मागणी आहे. ‘पाणी नाही, मतदान नाही’ अशी भूमिका जूनीच आहे. आम्ही सत्ताधारी आणि विरोधकांना कोणालाच मतदान करणार नाहीत. अधिका-यांनी हे घडवून आणले आहे. पाण्याची गळती रोखली असती तर आज पाण्याची समस्या आली नसती.
रहिवाशी सुधीर देशमूख म्हणाले, पाच वर्षांपासून वाकड परिसरात पाण्याची समस्या आहे. केवळ 10 टक्केच पाणी येत आहे. प्रत्येक निवडणुकी वेळी आश्वासन दिले जाते. महिन्याभरात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले जाते. परंतु, प्रश्न मार्गी लागला जात नाही. त्यामुळे ‘पाणी नाही तर मतदान नाही’ अशी भूमिका परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांनी घेतली आहे. विरोधात मतदान, नोटा अन्यथा मतदान प्रक्रियेत सहभाग नाही, अशा तीन प्रकारे अभियान चालविण्यात येत आहे.
युवराज पवार म्हणाले, पिंपरी महापालिका, पुणे महापालिका आणि पीएमआरडीए या तीनही संस्था गृहप्रकल्पांना मान्यता देतात. स्थानिक प्राधिकरण पाणीपुरवठा करणार नाही. तोपर्यंत बांधकाम व्यावसायिकांने पाण्याची व्यवस्था करण्याची हमी बिल्डरकडून घेतली जाते. परंतु, बिल्डर जबाबदारी पार पाडत नाहीत. त्यामुळे मागील पाच ते सात वर्षांपासून गृहनिर्माण सोसाट्यांमधील नागरिकांना पाणी मिळत नाही. नागरिक त्रस्त झाले आहेत. रोष व्यक्त करण्याचे एकच साधन आहे ‘पाणी नाही, मतदान नाही’. पाण्यासाठी आम्ही न्यायालयात याचिक दाखल करणार आहोत.