World Tiger Day: जाणून घेऊया ‘साया-क्लिओपात्रा’च्या अनोख्या जोडीविषयी…
World Tiger Day: ‘The Eternal Couple’, features Saaya, the Black Panther and Cleopatra, the Leopardess वरकरणी साया म्हणजे क्लिओपात्राची सावलीच वाटते. पण जवळून नीट पाहिल्यास त्याची सत्यता पटते, की तो खरंच काळा वाघ आहे.
एमपीसी न्यूज – सध्या सोशल मीडियावर एक रहस्यमय काळ्या रंगाच्या वाघाचे फोटो शेअर केले जात आहेत. एका प्राणीमित्र फोटोग्राफरने एक बिबळ्या आणि त्याचा जोडीदार काळा वाघ यांना आपल्या कॅमे-यात बंदिस्त केले आहे. थोडेसे अविश्वसनीय असे वाटणारे हे फोटो असले तरी ते सत्य आहेत. अशा प्रकारची जोडी एका राष्ट्रीय उद्यानात अस्तित्वात आहे. त्या जोडीतील मादीला त्याने ‘क्लिओपात्रा’ हे नाव दिले आहे. तो बिबळ्या आहे आणि ‘साया’ नावाचा तिचा जोडीदार काळा वाघ असा तो फोटो मिथुन एच यांनी मागील वर्षी नागरहोळ राष्ट्रीय उद्यानात टिपला होता.
वरकरणी साया म्हणजे क्लिओपात्राची सावलीच वाटते. पण जवळून नीट पाहिल्यास त्याची सत्यता पटते, की तो खरंच काळा वाघ आहे. खरंतर वाघांमध्ये नर वाघ जास्त आक्रमक असतो. मादी संयत असते.
पण इथे त्याच्या नेमके उलट आहे. ती क्लिओपात्राच जास्त आक्रमक आहे. मिथुनने या जोडीला ‘दैवी जोडी’ असे आपल्या पोस्टमध्ये संबोधले आहे.
काळा वाघ म्हटल्यावर आपल्याला हटकून जंगलबुकचीच आठवण होणे अपरिहार्य आहे. त्यातील बघिरा हा काळा वाघ कधीतरी खोटा आहे, असेच वाटत होते. पण नंतर वाघांच्या अनेक प्रकारांपैकी एक म्हणजे काळा वाघ आहे हे समजले. मात्र भारतात अनेक ठिकाणी काळा वाघ अस्तित्वात आहे.
हे सगळं आज आठवण्याचे कारण म्हणजे दरवर्षी 29 जुलै हा दिवस जगभर जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. 29 जुलै 2010 रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला.
या दिवसाचा उद्देश वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, तसेच त्याबद्दल जनजागृती करणे आणि वाघांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर विचार करणे असा आहे.
सध्या अभिमानाची बाब अशी आहे की भारताचा राष्ट्रीय प्राणी मानला जाणारा राजबिंडा वाघ मोठ्या प्रमाणात फक्त भारतातच उरला आहे. जगातील 70 टक्के वाघ भारतात आहेत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगभरात सुमारे 1,00,000 वाघ होते. मात्र सध्या ही संख्या सुमारे 3062 ते 3948 इतकी असल्याचा अंदाज आहे.
यापैकी सुमारे 2000 वाघ भारतीय उपखंडात आहेत. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व भारतासाठी विशेष आहे. वाघांची संख्या झपाट्याने कमी होण्याची कारणे नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, चोरटी शिकार असे आहेत.
महाराष्ट्रात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यात सर्वात प्रमुख म्हणजे चंद्रपूर येथील ताडोबा- अंधारी प्रकल्प, नागपूरमधील पेंच प्रकल्प, अमरावती मधील मेळघाट, कोयनानगर, चांदोली येथील सह्याद्री प्रकल्प, भंडारामधील नवेगाव नागझिरा व वर्ध्यामधील बोर प्रकल्प हे आहेत.
भारतात 1973 साली व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झाली. त्यावेळी देशात 9 व्याघ्र प्रकल्प होते. आता त्याची संख्या 38 वर गेली आहे. नॅशनल टायगर कॉन्झरवेशन ॲथॉरिटीमुळे गेल्या दहा वर्षात वाघांची संख्या वाढण्याबरोबरच त्यांची माहिती संकलन करण्यात (डॉक्युमेंटेशन) ही आपला देश पुढे आहे.
वाघांची संख्या वाढणे हे एक प्रकारे चांगल्या वनसंवर्धनाचे द्योतक आहे. कारण वाघांची चांगली संख्या असण्यासाठी त्यांचा नैसर्गिक अधिवास उत्तम असणे आवश्यक आहे. म्हणजेच वाघांसाठी चांगले अन्न, निवारा असलेले जंगल असणे आवश्यक आहे. व्याघ्र संख्येमध्ये महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर आहे.
केंद्र शासनाच्या याच अहवालानुसार महाराष्ट्रात 2006 साली 103, 2010 साली 169 आणि 2014 साली झालेल्या सर्वेक्षणात सरासरी 190 वाघांचे अस्तित्व आढळून आल्याची नोंद आहे.
व्याघ्र रक्षणासाठी महाराष्ट्रात विशेष व्याघ्र दलाची स्थापना करण्यात आली आहे. या दलाकडून व्याघ्र संरक्षणाचे काम अत्यंत जबाबदारीने पार पाडण्यात येत आहे. याशिवाय वनाधिकाऱ्यांना शस्त्र परवाने, व्याघ्र प्रकल्पात वायरलेस सेट देण्यात आले आहेत तर काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.