Talegaon Dabhade : आत्मभानातूनच जगण्याचा प्रवास शक्य – मिलिंद शिंदे
एमपीसी न्यूज – शिक्षक हे ज्ञानाने भरलेला खजिना (Talegaon Dabhade) असतात. हा खजिना रीता करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसीत करायला हवी. शिक्षण आणि शिक्षक हे प्रत्येकाच्या आयुष्यात उभे राहण्यासाठी नेहमीच साह्यभूत असतात असे मत अभिनेते व दिग्दर्शक मिलिंद शिंदे यांनी व्यक्त केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्था परिवाराच्या वतीने आयोजित शिक्षक दिन समारंभात मंगळवारी (दि. 5) ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, खजिनदार शैलेशभाई शहा, सदस्य विलास काळोखे, संदीप काकडे, परेश पारेख, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, डी फार्मसीचे प्राचार्य प्रा जी एस शिंदे,बी फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय आरोटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या विविध शाळा, महाविद्यालयामध्ये उत्तम सेवा करणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, आपले आत्मभान जागरूक ठेवण्याचे काम शिक्षकवृंद करतात त्यामुळेच आपण आयुष्यात योग्य मार्गावर पुढे जाऊ शकतो म्हणूनच शिक्षक कधी निवृत्त होत नसतात ते आपले ज्ञानदानाचे काम सदैव करीत असतात आणि याच वेगळया कामासाठी ते समाजात नेहमीच सन्मानास पात्र ठरतात असे गौरवोद्गार अभिनेते शिंदे यांनी काढले. यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील शिक्षकांच्या सुखद आठवणींना उजाळा देत उपस्थित सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे म्हणाले की, आजच्या आधुनिक युगातील शिक्षकांनी नवनवीन ज्ञानाची क्षेत्रे पादाक्रांत करायला हवी. विद्यार्थ्याना काळासोबत जगण्याचे भान आणि ज्ञान देण्याचे कार्य सर्वच शिक्षक करीत असतात याचा अभिमान असल्याचे काकडे यांनी सांगितले. आपल्याला शिक्षण व्यवस्थेची उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे. शिक्षणाच्या जोरावर समाज, संस्कृती उन्नत आणि विकसित होते असे यावेळी रामदास काकडे म्हणाले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतींना वंदन करत शिक्षकाने समर्पण भावनेने ज्ञानदानाचे काम करीत राहावे असे सांगितले. तसेच इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख उपस्थितांसमोर मांडला.
सूत्रसंचालन प्रा.डॉ.अर्चना जाधव आणि प्रा.दीप्ती कान्हेरिकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार बी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे (Talegaon Dabhade) यांनी मानले.