Charholi News : राष्ट्रवादीने भरविलेल्या बैलगाडी शर्यतीमधील वाद भाजप आमदाराने मिटविला!

आयोजक अन्‌ गाडामालकांमधील गैरसमज दूर झाल्याचा दावा

एमपीसी न्यूज – खेड तालुक्याचे माजी सभापती रामदास ठाकूर-पाटील (Charholi News) यांच्या वाढदिवसानिमित्त चऱ्होली खुर्द येथे आयोजित ‘महाराष्ट्र केसरी बैलगाडा स्पर्धांच्या शेवटच्या दिवशी पंचांनी दिलेल्या निर्णयावरुन वाद निर्माण झाला होता. स्पर्धेला गालबोट लागले होते. यामध्ये मध्यस्थी करत भाजप आमदार महेश लांडगे यांनी हा वाद मिटविला. आयोजक अन्‌ गाडामालकांमधील गैरसमज दूर झाल्याचा दावाही त्यांनी केला.

नेमका काय झाला होता वाद?

शिवराज आव्हाळे, आव्हाळवाडी, बाळासाहेब साकोरे, फुलगाव, विनायक मोरे, चिखली, रामनाथ वारिंगे, वारंगवाडी, बापुसाहेब आल्हाट, निघोजे आणि शिवराज आव्हाळे, आव्हाळवाडी या पाच गाडा मालकांना महिंद्रा थार गाडीचे बक्षीस विभागून देण्यात आले. फायनलच्या बारीदरम्यान रामनाथ वारिंग यांच्या गाडीने 11.52 सेकंदात घाट पार केला, असा निर्णय पंचांनी दिला. मात्र, हा निर्णय वारिंगे यांना मान्य नव्हता. तसेच, आयोजक आणि पंच आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळे वाद निर्माण झाला.

यामध्ये मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पंच आणि आयोजकांचा निर्णय मान्य असल्याचे सांगितले. पोलिसांच्या मदतीने वादाचा प्रसंग नियंत्रणा आणला. मात्र, बैलगाडा आयोजक आणि मालकांमधील वाद धुमसत होता. दरम्यान, पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर राहुल जाधव यांच्या पुढाकाराने आमदार महेश लांडगे (Charholi News) यांच्या उपस्थितीत आयोजक आणि गाडामालक यांची समोरासमोर बैठक घेण्यात आली. बैलगाडा शर्यत हा आपला परिवार आहे. त्यामुळे परिवारातील वाद सामंजस्याने मिटवण्याची भूमिका घेण्यात आली. यावेळी आयोजक रामदास ठाकूर-पाटील, गाडामालक रामनाथ वारिंगे, शिवराज आव्हाळे यांच्यासह अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही –

आमदार लांडगे म्हणाले की, खेडचे माजी सभापती रामदासशेठ ठाकूर-पाटील यांनी घेतलेल्या ‘महाराष्ट्र केसरी बैलगाडा’ स्पर्धांचा हेतू हाच आहे की, शेतकऱ्यांचा आनंद टिकला पाहिजे. आपली परंपरा टिकली पाहिजे. शेतकऱ्यांचा हा खेळ उंचीवर नेण्यासाठी कोणी प्रयत्न करीत असेल, तर आम्ही सर्व बैलगाडा मालक, संघटना, बैलगाडा प्रेमी निश्चितपणे मदत करणार आहेत. स्पर्धेत अत्यंत सक्षमपणे नियोजन करण्यात आले. एवढ्या भव्य प्रमाणात शर्यती होत आहेत. त्यामुळे किरकोळ वाद होणे स्वाभाविक आहे. त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. या ठिकाणी कोणाताही पक्ष नाही. बैलगाडा हाच स्पर्धेत पक्ष असतो. त्यामुळे राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही.

PCNTDA : साडेबारा टक्के परताव्याचा शासन निर्णय आठ दिवसात निघणार

काही टवाळखोरांनी गर्दीचा फायदा घेतला

गाडामालक रामनाथ वारिंगे म्हणाले की, ज्यांच्या घरी बैलाचे एक शेपुटसुद्धा नाही, असे काही हौसे-गौसे स्पर्धा बघायला आले होते. काही टवाळखोर लोकांनी गर्दीचा फायदा घेवून आयोजक आणि आमच्या वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या आवाहनानंतर आम्ही माघार घेतली होती. मात्र, काही लोकांना हा वाद वाढवायचा होता. आता आमदार महेश लांडगे यांनी मध्यस्थी केली. आमचा आयोजनकांवर कोणताही राग किंवा गैरसमज नाही. बैलगाडा शर्यतींना गालबोट लागू नये, अशीच आमची भावना आहे.

गैरसमजातून झालेल्या वाद मिटला आहे. कोणाच्याही मनात क्लेश- राग नाही. काही समाजकंटक बैलगाडा शर्यत किंवा गाडामालकांची बदनामी सोशल मीडियावर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या कारस्थानाला कोणीही बळी पडू नये, असे आवाहनही वारिंगे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.