Baramati : विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू; महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी खांबावर चढायला लावल्याचा नातेवाईकांचा आरोप
एमपीसी न्यूज -पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एका गावातून (Baramati )धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विजेच्या खांबावर चढलेल्या एका शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. विशेष म्हणजे दुरुस्तीसाठी महावितरणच्या एका कर्मचाऱ्यानेच या शेतकऱ्याला खांबावर चढण्यास भाग पाडले असा आरोप मयत शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी केला.
विजय मुरलीधर गवळी (वय 55) असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.या प्रकरणी अधिक माहिती अशी की, वीज दुरुस्तीसाठी काही कर्मचारी गावात आले होते. दरम्यान विजय गवळी यांना विजेच्या खांबावर चढता येत होते.
त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी गवळी यांना खांबावर चढण्यासाठी सांगितले. विजेचा प्रवाह सुरू असतानाही या कर्मचाऱ्याला वर जाण्यासाठी त्यांनी सांगितल्याचा आरोप गवळी यांच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान खांबावर चढलेल्या गवळी यांचा हात विजेच्या तारेला लागला आणि विजेचा जोरदार धक्का बसून ते खाली कोसळले.
महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी या शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर हे दोन्ही कर्मचारी त्या ठिकाणाहून गायब झालेत. जोपर्यंत या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत मुक्तदेह ताब्यात घेणार नसल्याचे (Baramati) नातेवाईकांनी सांगितले.