Pimpri: देहूच्या इंद्रायणीनदीतून शहरासाठी 100 एमएलडी पाणी द्या; पालिकेची राज्य सरकारकडे मागणी 

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवडकरांसाठी भामा आसखेड धरणातून 167 एमएलडी आणि आंद्रा धरणातून 100 एमएलडी  पाणी मिळावे यासाठी महापालिकेने पाठबंधारे विभागाकडे फेरप्रस्ताव सादर केला आहे. मंत्री उपसमिती त्यावर निर्णय घेणार आहे. दरम्यानच्या काळात शहरवासियांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी इंद्रायणीनदीवरील देहू बंधा-यातून शंभर एमएलडी पाणी उचलण्याची परवानगी देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली असल्याची माहिती, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी)दिली. 

पत्रकारांशी बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेची लोकसंख्या सुमारे 22 लाखाच्या आसपास पोहोचली आहे. तसेच मोठ्याप्रमाणावर ग्रहप्रकल्पाचे प्रमाण वाढल्याने 470  एमएलडी पाणी कमी पडत आहे. त्यामुळे भामा आसखेड धरणातून 167 एमएलडी आणि आंद्रा धरणातून 100 एमएलडी  पाणी आणण्यात येणार आहे. हा पाण्याचा आरक्षित कोटा त्वरित मंजूर करावा, यासाठी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली.

आद्रा-भामा आसखेडचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार आहे. निविदा काढण्याची तयारी पुर्णपणे झाली आहे. आरक्षित पाणी कोट्यास मंजूरी मिळाल्यास काम त्वरित सुरु करण्यात येईल. आंद्रा व भामा आसखेड धरणातील मुख्य जलवाहिनी मंगरूळ व करंजविहिरे ते नवलाख उंब्रे येथील नियोजित बीपीटीपर्यंत व एकत्रित गुरूत्व जलवाहिनी नवलाख उंब्रे ते बीपीटी चिखली येथील नियोजित जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्याचे नियोजन आहे. या प्रक्रियेला विलंब लागणार आहे.

दरम्यानच्या काळात  पिंपरी-चिंचवडकरांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी इंद्रायणीनदीवरील देहू बंधा-यातून शंभर एमएलडी पाणी उचलण्याची परवानगी देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. सरकारने परवनगी दिल्यास  देहू येथील बंधा-यातून चिखलीत पाणी आणून तेथून परिसरातील भागास पिण्याचे पाणी पुरविण्यात येणार आहे, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.