Pimpri: भाजपच्या नाकर्तेपणामुळेच शहरातील संरक्षणखाते विषयक प्रश्न प्रलंबित

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा आरोप

एमपीसी न्यूज – संरक्षण मंत्रालयाशी संबंधित महाराष्ट्रातील प्रलंबित विकास कामांविषयी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत पुण्यातील संरक्षण विषयक प्रश्न मार्गी लागले. परंतु, पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षणखाते विषयक सर्व प्रश्न प्रलंबित आहेत. यासाठी शहरातील भाजपच्या बेजबाबदार पदाधिका-यांनी पाठपुरावा केला नाही. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच शहरातील संरक्षण विषयक प्रश्न प्रलंबित राहिले असल्याचा आरोप राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी केला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कलाटे यांनी म्हटले आहे की, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि संरक्षणमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.27) महाराष्ट्रातील संरक्षण मंत्रालयाशी संबंधित प्रलंबित विकास कामांविषयी महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यामध्ये पुणे विमानतळासाठी 15.84 एकर जागा हस्तांतरित करणे, विमानतळासंदर्भात इतर मान्यता देणे, चांदणी चौक आणि एनडीए पाषाण रोडच्या परवानग्या देणे इत्यादी पुणे जिल्हाशी संबंधित कामे मार्गी लावली.

परंतु, पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षण मंत्रालयाशी संबंधित असेलेली पिंपळे सौदागर येथील रक्षक सोसायटीचा रस्ता हस्तांतरित करणे, पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलास संरक्षण विभागाकडून परवानगी मिळवणे. तसेच निगडी, यमुनानगर, तळवडे रुपीनगर, त्रिवेणीनगर तसेच भोसरी, दिघी, च-होलीमधील काही भाग रेड झोनने बाधित होत असल्यामुळे येथील बांधकामांना परवानगी दिली जात नाही. रेड झोन हद्द कमी करण्यासाठी भाजप सत्ताधा-यांकडून पाठपुरावा झाला नाही. परिणामी, ही कामे अद्यापही प्रलंबित राहिली आहेत.

महापालिकेतील भाजपाच्या कारभा-यांनी पाठपुरावा केला असता तर गुरूवारी (दि. 27) झालेल्या बैठकीत पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षण मंत्रालयाशी संबंधित वरील कामे मार्गी लागली असती. परंतु, भाजपाच्या बेजबाबदार पदाधिका-यांमुळे हे प्रश्‍न अद्यापही प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे शहरातील भाजप कारभा-यांचा नाकर्तेपणा परत एकदा दिसून आला आहे.

भाजपकडे महापालिकेची सत्ता सोपविल्यानंतर दोन वर्षातच पिंपरी-चिंचवडकरांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. शहरातील कचरा, पाणी पुरवठा, आरोग्य इत्यादी मूलभूत गरजा देखील व्यवस्थित पुरवू शकलेले नाहीत. केवळ आश्‍वासने देऊन जनतेची फसवणूक केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे प्रकल्प राबविले आहेत, ते सुध्दा नीट सांभाळता येत नाहीत, असेही कलाटे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.