Pimpri : नदी प्रदूषण प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करा, थेट ‘पीएमओ’कडे तक्रार
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना आणि इंद्रायणी नदीत (Pimpri) रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याने नद्या सातत्याने फेसाळत आहेत. नद्यांच्या या अवस्थेला महापालिकेचा पर्यावरण विभाग जबाबदार असल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या पर्यावरण प्रेमी नागरिकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. नदी प्रदूषणाला जबाबदार असलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी पत्रातून केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. पवना नदीची महापालिका हद्दीतील लांबी 24.34 किलोमीटर, इंद्रायणी नदीची एकूण लांबी 20.85 किलोमीटर आहे. तर मुळा नदी शहराच्या सीमेवरून 10 किलोमीटर अंतर वाहते. तळवडेपासून च-होलीपर्यंत इंद्रायणी नदीचे प्रदूषण वाढले आहे.
तर, किवळेपासून दापोडीपर्यंत पवना नदीचे प्रदूषण वाढले आहे. नदीलगतच्या भागात किवळे, पुनावळे, रावेत, ताथवडे, वाल्हेकरवाडी, थेरगाव, चिंचवडगाव, काळेवाडी, पिंपरी, दापोडी, पिंपळेगुरव, सांगवी, कासारवाडी व दापोडीपर्यंत पाण्याचे प्रदूषण वाढल्याचे दिसून येते.
Talegaon : दिवाळीनिमित्त उभारलेल्या किल्ल्याच्या हलत्या देखाव्यातून उलगडला पावनखिंडीचा इतिहास
पवना नदी सातत्याने फेसाळत आहे. नदीतील पाण्यावर फेस तरंगतो. नदी प्रदूषित झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात पाचवेळा नदी फेसाळली आहे. थेरगावातील केजुदेवी बंधारा ते चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी घाट या दरम्यान पवना नदी मोठ्या प्रमाणात फेसाळते.
सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी नदीपात्रात सोडल्याने सातत्याने नदी फेसाळत आहे. पवनामाईची दुरावस्था झाली आहे. नदीच्या दूरावस्थेला महापालिकेचा पर्यावरण विभाग जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
पर्यावरणप्रेमी प्रशांत राऊळ म्हणाले, पवना, इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाला महापालिकेचा पर्यावरण विभाग जबाबदार आहे. वर्षानुवर्षे नदी प्रदूषणाबाबत आम्ही बोलत आहोत. परंतु, प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नदी प्रदूषणाला जबाबदार असणा-यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नगरविकास खात्याला पत्र पाठविले आहे. नदी प्रदूषणाबाबत पर्यावरण विभागाच्या अधिका-यांना निलंबित करण्याची (Pimpri) मागणी केली आहे.