Alandi : पालखी प्रस्थानाच्या वेळी नेमके काय घडलं? … देवस्थानच्या वतीने निवेदन जारी

सोहळा प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील व प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी स्पष्ट केली वस्तुस्थिती

एमपीसी न्यूज : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानाच्या वेळी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न वारकरी विद्यार्थ्यांच्या समूहाने केल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या वतीने सविस्तर निवेदन जारी करण्यात आले आहे. 

सोहळा प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील व प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी प्रसिद्धीस दिलेले निवेदन पुढीलप्रमाणे…

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आषाढीच्या पायीवारी साठी श्री क्षेत्र आळंदी येथून रविवार तारीख  11 जून 2023 रोजी प्रस्थान होते वेळी आळंदी (Alandi) येथील वारकरी विद्यार्थ्यांच्या एका समूहाने जो पवित्रा धारण केला त्यापायी वातावरण अस्थिर होण्याची चिन्हे दिसू लागल्याने मंदिर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलीस यंत्रणेला जो हस्तक्षेप करावा लागला त्या संदर्भात आतापर्यंत विविध माध्यमातून उलटसुलट मतमतांतरे प्रसृत झालेली आहेत.

श्री ज्ञानोबारायांच्या पालखीचे प्रस्थान पंढरीच्या पायवारीसाठी होत असताना जो अनुचित व खेदकारक प्रसंग घडला. त्या संदर्भातील काही पार्श्वभूमी व वस्तुस्थिती मांडण्यासाठी प्रस्तृत निवेदन दिले आहे. श्री ज्ञानोबारायांच्या पालखीचे आषाढीच्या पायवारीसाठी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होत असताना दरवर्षी दिंड्यातील वारकरी भाविक पोलीस यंत्रणा प्रशासन ग्रामस्थ व अन्य दृष्टीनेच्छंची जी मोठी संख्या मंदिराच्या आवारात जमत असते तिच्यावर काही एक नियंत्रण असण्या संदर्भातील चर्चा व विचार विनिमय 2017 -18 सालापासून सतत चालू आहे.

विशेषतः मांढरदेवी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, प्रस्थानाच्या वेळी मंदिराच्या आवारात जमणाऱ्या भाविकांच्या संख्येवर मर्यादा घालण्या संदर्भात  विचारविनिमय करण्यास 2017-18 साला पासूनच सुरवात केलेली होती. श्री ज्ञानोबारायांचे मंदिर, मंदिरातील वीणा मंडप, कारंजा मंडप व पंखा मंडप या तीन मंडपासह मंदिरातील प्रदक्षिणा मार्ग,ओवऱ्या ,गच्ची,व गॅलऱ्या अशा सर्व भागात , सुरक्षा, आरोग्य व व्यवस्थापन या तीनही दृष्टीने सुरक्षित व संबंधित वास्तुशास्त्रीय मानकांनुसार किती माणसे सामावून घेता येणे शक्य आहे.

यांबाबतचा अभ्यास संस्थान कमिटीने एका मान्यताप्राप्त वास्तुविद्याविशारद संस्थेकडून करून घेतला.सदर संस्थेने निर्धारित केलेल्या अभ्यासानुसार , मंदिराच्या आवारातील प्रदक्षिणा मार्गावर साधारणपणे 4400 ते 4500 व्यक्ती सुरक्षितरित्या वावरू व खेळू शकतील अशी आकडेवारी पुढ्यात आली.

पालखी प्रस्थानचे वेळी परंपरेनुसार श्रीज्ञानोबारायांच्या रथापुढील 27 दिंड्या तर रथामागील 20 दिंड्या अशा एकंदर 47 दिंड्यामधील वारकरी मंदिरात येतात व मंदिरातील प्रदक्षिणा मार्गावर त्यांच्या त्यांच्या निर्धारित जागी त्यांचे भजन व खेळ प्रस्थान सोहळा साजरा होत असताना चालू असतात.

वास्तु विशारदांनी हिशोब केलेल्या आकडेवारीच्या अनुषंगाने या 47 दिंड्यामधील किती वारकऱ्यांना प्रस्थानाच्या वेळी मंदिरात प्रवेश देता येईल  या संदर्भात फडकरी व दिंडीकरी यांच्या पातळीवर देखील विचार व्हावा या दृष्टीने सदर आकडेवारी संस्थान कमिटीने त्यांना सादर देखील केली.

या संदर्भात संबंधित फडकरी व दिंडीकरी यांनी तत्वश: अनुमती व संमती देखील दर्शवली.सदर चर्चा 2018-19 या वर्षांपासून सतत चालू राहीली व तिची वाटचाल देखील समाधानकारक अशीच होती. याच संदर्भात, पुण्याचे माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  संजय देशमुख  व सहाय्यक धर्मादाय आयुक्त सुधीर बुक्के यांनी तारीख 14 ऑगस्ट 2022 या दिवशी श्रीज्ञानोबारायांच्या सोहळ्याशी संबंधित वर्षासनदार मानकरी फडकरी व दिंडेकरी यांच्याशी आळंदी येथे प्रत्यक्ष चर्चा करून प्रस्थानासाठी मंदिरात प्रत्येक दिंडी मधून किती वारकरी आणावयाचे यासंदर्भातील संख्या दिंडीकऱ्यांनीच निश्चित करावी असे प्रस्तावित केले त्याबाबत 2022 सालातील कार्तिकी वारी दरम्यान ठरले.

त्याचप्रमाणे दिंडी मधील वारकऱ्यांच्या संख्येवर मर्यादा असतानाच प्रस्थानच्या दिवशी मंदिराच्या आवारात जमणारे अन्यभाविक ग्रामस्थ पालखी मंदिरातून बाहेर आणण्याचा मान असणारे आळंदी ग्रामस्थ खांदेकरी प्रशासनाचे कर्मचारी स्वयंसेवक पोलीस कर्मचारी यांच्या संख्येवरही संस्था कमिटीने मर्यादा आणावी अशी मागणी दिंडीकऱ्यांनी केली व तिला सर्वांनी दुजोरा ही दिला.

यंदा तारीख 24 मे 2023 या दिवशी पुण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री नांदेडकर  व सहाय्यक धर्मदाय आयुक्त सुधीर बुक्के यांनी फडकरी व प्रस्थानचे वेळी मंदिरात प्रवेश असणारे 47 दिंडीकरी यांच्याशी आळंदी येथे प्रत्यक्ष चर्चा करून प्रस्थानसाठी मंदिरात येणाऱ्या दिंड्यामधील वारकऱ्यांच्या संख्येबाबत निश्चिती करण्या संदर्भात विचारविनिमय केला.<

दिंडीकऱ्यांनी स्वयंनिर्णयाने संख्येची मर्यादा ठरवावी, असे आवाहनही सर्व संबधीताना केले. त्यानंतर फडकरी व उपस्थित दिंडीकरी यांची संस्थानचे विश्वस्त व 2023 या वर्षीसाठीचे सोहळा प्रमुख अ‍ॅडव्होकेट विकास ढगे पाटील ,श्री गुरू हैबतबाबांचे वंशज प्रतिनिधी बाळासाहेब आरफळकर , संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, ज्ञानोबारायांचे चोपदार राजाभाऊ चोपदार व बाळासाहेब चोपदार यांच्याशी तपशीलवार चर्चा झाली.

2023 या वर्षीच्या पालखी सोहळ्या दरम्यान प्रस्थानच्या वेळी मंदिरात प्रवेशणाऱ्या 47 दिंड्या व त्यातील अधिकृत गट यांमधून 75 वारकरी प्रस्थानच्या दिवशी मंदिराच्या आवारात येतील. असा निर्णय त्या चर्चेअंती सर्वानुमते घेण्यात आला. त्या निर्णयाबाबतच्या बातम्या देखील माध्यमांद्वारे प्रसृत झाल्या.

प्रस्थानच्या आदल्या दिवशी म्हणजेच 10 जून 2023 या दिवशी पुण्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश चांडक साहेब यांनी आळंदी( Alandi ) येथे संध्याकाळी फडकरी व 47 दिंड्यांचे उपस्थित दिंडीकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. प्रस्थानसाठी मंदिरात प्रवेश  असणाऱ्या प्रत्येक दिंडीस प्रत्येकी  75 पासेस संस्थान कमिटीकडून दिले जातील व 47 दिंड्या मधून कोणते 75 पासेस तयार करून संख्यानियुक्त चोपदारांच्या माध्यमातून  ते दिंडीकऱ्यांना पोहचते करण्याची व्यवस्था राबवली.

श्रीज्ञानोबारायांच्या पादुका वीणा मंडपातील पालखीमध्ये ठेवल्यानंतर पालखी मंदिरातून आजोळघरात पोहचविण्याचा मान परंपरेने आळंदीकर ग्रामस्थांचा आहे. पालखीचे खांदेकरी म्हणून सेवा बजवणाऱ्या आळंदीकर ग्रामस्थांची संख्यादेखील 125 इतकीच असावी व तेवढेच पास संस्थान तयार करू न देईल.

असा प्रस्ताव स्वीकारण्यास ग्रामस्थांना संस्थान कमिटीने मोठ्या प्रयत्नांनी राजी बनवले.त्या संदर्भात काही आळंदीकर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व असंतोष देखील प्रगट केला. परंतु  प्रस्थानच्या दिवशी अंतिमतः ग्रामस्थांनी सहकार्य केले.

प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी म्हणजे रविवार तारीख 11 जून 2023 या दिवशी दुपारी श्रींचा नैवेद्य झाल्यानंतर संपूर्ण मंदिर रिकामे करण्यात आले.

त्यानंतर दुपारी 2:30 वाजल्यापासून परंपरेनुसार मंदिरात प्रवेशणाऱ्या  47 दिंड्या त्यांच्या ठरलेल्या मार्गाने मंदिर परिसरात येण्यास सुरुवात झाली.दिंडीतील वारकऱ्यांचे पासेस बघून त्यांना मंदिराकडे रवाना करण्याचे काम पोलीस करत होते. तर शिरस्त्यानुसार प्रत्येक दिंडीस महाद्वारातून प्रवेश देण्याचे काम चोपदार चोखपणे राबवत होते.

याच दरम्यान मोठ्या संख्येने काही वारकरी विद्यार्थी वै.जोग महाराजांनी स्थापन केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेची जुनी इमारत असलेल्या बोळात जमले असून आम्हांला प्रस्थानसाठी मंदिरात प्रवेश मिळावा अशी मागणी ते करत असल्याचे संस्थानचे विश्वस्त व सोहळा प्रमुख अ‍ॅडव्होकेट विकास ढगे पाटील यांना संस्थानच्या कर्मचाऱ्याकडून कळले.विद्यार्थ्यांची ती संख्या अदमासे 300 ते 400 इतकी असावी.

संबंधित विद्यार्थ्यांना समजवण्याचा प्रयत्न बंदोबस्तावर असणार पोलीस कर्मचारीही त्याच वेळी करत होते.प्रस्थान सोहळ्यासाठी असणारा पास नसलेल्यांना मंदिरात प्रवेश देता येणार नाही .ही बाब पोलीस अधिकारी व कर्मचारी त्या विद्यार्थ्यांना स्पष्ट करत होते.

परंतु मंदिरात दर गुरुवारी आयोजित करण्यात येणाऱ्या पालखीमध्ये आमचा नित्य सहभाग असतो.तसेच मंदिरात साजऱ्या होणाऱ्या सप्ताहां मध्ये देखील आमची वर्षभर सेवा चालू असते.त्यामुळे पासेस जरी नसले तरी प्रस्थानसाठी मंदिरात प्रवेश मिळणे हा आमचा अधिकार होय.त्यांमुळे आम्हा सगळ्यांना मंदिरात प्रवेश मिळालाच पाहिजे.असा जमलेल्या विद्यार्थ्यांचा आग्रह होता.

संस्थान कमिटीचे विश्वस्त व सोहळा प्रमुख अ‍ॅडव्होकेट विकास ढगे पाटील यांनी मग मंदिरातून बाहेर येत पोलिसांकडे असलेल्या ध्वनिक्षेपक यंत्रणेद्वारे जमलेल्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.आपण निष्ठेने बजावत असलेल्या श्रीज्ञानोबारायांच्या सेवेबद्दल आम्हांला नितांत आदरच आहे. परंतु मंदिरातील संख्येने नियंत्रण करण्याच्या हेतूने प्रवेशा संदर्भात जी मार्गदर्शक तत्वे ठरविण्यात आलेली आहेत.

त्यांचे पालन सर्वच घटकांनी करणे अपेक्षित आहे .परंपरेने मंदिरात येणारे सर्व 47 दिंडीकरी प्रत्येकी 75 वारकऱ्यांच्या मर्यादेचे पालन काटेकोरपणे करत आहेत. आपली सेवा व निष्ठा यांचा आदर करण्याच्या दृष्टीने आपल्या पैकी 30 ते 35 जणांची प्रातिनिधिक यादी आपण संस्थान कमिटीस तयार करून लगोलग द्यावी व त्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांना प्रस्थानसाठी मंदिरात प्रवेश  देण्यात येईल.

आपण सगळेच ज्ञानोबारायांचे सेवेकरी आहोत. वारकरी संप्रदायाचे वैभव वारकऱ्यांची प्रतिमा ,शिस्त,संतांची शिकवण,वारकरी शिक्षण संस्थांचा असणारा लौकिक  व सोहळ्याचे पावित्र्य यांना गालबोट लागेल असे कोणतेही पाऊल आपण कृपया उचलू नये व प्रस्थान आनंदाने पार पाडण्यासाठी सहाय्य करावे  अशी विनंती ही सोहळा प्रमुखांनी सर्व विद्यार्थ्यांना केली.

परंतु असा  कोणताही प्रस्ताव शांतपणे ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत संबंधित विद्यार्थी नव्हते. तिथे जमलेल्या सगळ्या म्हणजे सुमारे 300 ते 400 विद्यार्थ्यांना मंदिरामध्ये प्रस्थान सोहळ्यासाठी प्रवेश मिळालाच पाहिजे.असा विद्यार्थ्यांचा पवित्रा  कायम होता. गोंधळ करणाऱ्या विद्यार्थ्यांना संयम व सहकार्याचे आवाहन करून सोहळा प्रमुख पुन्हा मंदिरात परतले.

सोहळा प्रमुखांनी विद्यार्थ्यांना विनंतीवजा आवाहन करण्यापूर्वी तशाच आशयाचा प्रस्ताव  व आवाहन श्री ज्ञानोबारायांचे चोपदार राजाभाऊ  चोपदार यांनी देखील विद्यार्थ्यांच्या पुढ्यात सादर केलेला होता. परंतु त्यांचेही काही ऐकून घेण्याच्या मन: स्थितीत विद्यार्थी नव्हते. सोहळा प्रमुख मंदिराकडे परतल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांनी पोलिसांचे कडे भेदून मंदिराकडे धाव घेतली.

मंदिराकडे नियंत्रित प्रवेश देण्याच्या हेतूने उभे केलेले बॅरिकेड्स बळाने दूर करून प्रस्थान साठी मंदिराकडे धाव घेणाऱ्या वारकरी विद्यार्थ्यांना आवरण्याकरता त्या वेळी बंदोबस्तासाठी तिथे उभ्या असणाऱ्या पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपाची सगळी पार्श्वभूमी व त्या प्रसंगा पूर्वी घडलेल्या घटनांचा क्रम असा आहे. सदर प्रसंग हा सगळ्यांच्याच दृष्टीने अतिशय खेदकारक व अनुचित होता.थोडे सामंजस्य दाखवल्याने तो टाळताही आला असता.

मंदिराचे आवार व प्रस्थानसाठी दरवर्षी वाढत जाणारी गर्दी ध्यानात घेता सोहळ्यासाठी मंदिरात जमणारे वारकरी दिंडीकरी व अन्य भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रस्थानाच्या वेळी मंदिरात किती व्यक्तींना प्रवेश द्यायचा हा सतत कळीचा मुद्दा ठरत आलेला आहे. हा प्रश्न भावने इतकाच व्यवस्थापनाचा व कायदा सुवस्थेचा देखील आहे.त्यामुळे सर्व संबंधितांशी सतत विचार विनिमय करून संस्थान कमिटीने यंदा दिंड्या मधील वारकऱ्यांची  पालखी सोहळ्याशी संबंधित सर्व घटकांनी विवेक बाळगून केलेल्या सहकार्यामुळे प्रस्थान सोहळा साजरा झाला.

सेवा आणि शिस्त भावना आणि सारासार विचार यांचे संतुलन येत्या काळात सर्वांनाच पाळावे लागणार आहे. तेव्हा प्रस्थान सोहळ्यासाठी यंदा मंदिरात प्रवेश देण्याबाबत मार्गदर्शक तत्वे सर्व संबधीतांशी चर्चमसलत करून निश्चित करण्यामागे संस्थान कमिटीचा कोणताही स्वार्थ नाही.

अथवा कोणालाही ज्ञानोबारायांच्या सेवेपासून वंचीत करावे,भेदभाव करावा,असा हेतू अजिबातच नाही आणि केव्हाच नव्हता. दिंड्या मधील वारकऱ्यांसह मंदिरात जमणाऱ्या भाविकांची सुरक्षा संप्रदायाची प्रतिमा आणि व्यापक सामाजिक सलोखा व हित यांचा विचार या सगळ्यात मुख्य होता.

वारकरी विद्यार्थ्यांसह सर्वच संबंधितांनी या सगळ्याचा विचार करता कोणताही किंतू मनात न ठेवता संस्थान कमिटीस यापुढेही सहकार्य करावे.अशी नम्र विनंती सदर अनुचित घटनेसारख्या खेदकारक प्रसंगाची पुनरावृत्ती टाळणे हे आपल्या सगळ्यांचेच कर्तव्य आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.