Chinchwad Bye-Election: लक्ष्मणभाऊंनी शास्तीकरचा प्रश्न सोडविला – अश्विनी जगताप
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकाम आणि शास्तीकराचा (Chinchwad Bye-Election) प्रश्न दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी सतत पाठपुरावा करून सोडवला. फक्त शासन आदेश काढायचे बाकी असल्याचे भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी सांगितले. माझे साहेब गेले, पण आपला गड आपणाला राखायचा आहे, अशी भावनिक सादही त्यांनी मतदारांना घातली.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार असलेल्या अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर आयोजित सभेत त्या बोलत होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, धनंजय महाडीक, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार राम सातपुते, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, माजी मंत्री विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी महापौर माई ढोरे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्रदेश सचिव अमित गोरखे आदी उपस्थित होते.
अश्विनी लक्ष्मण जगताप म्हणाल्या, “दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर काही दिवसांतच पोटनिवडणुकीला (Chinchwad Bye-Election) सामोरे जाण्याची वेळ माझ्यावर व जगताप कुटुंबावर आली. तुम्ही मतदारांनी दिलेल्या भरघोस पाठिंब्यामुळे मला हिंमत आली. माझे पती दिवंगत लक्ष्मण जगताप वाघासारखे जगले. ते आजारी असताना त्यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरू होते. त्यांना अमेरिकेतून आणलेली औषधे दिली जात होती. ते अशक्त झाले होते.
डॉक्टरांनी त्यांना व्हिलचेअरवर फिरवण्याचे आणि त्यांना माणसांसोबत बोलण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार मी त्यांना भेटायला आलेल्या लोकांना भेटण्यास सांगितले. अनेकजण तुम्हाला भेटण्यास, तुम्हाला एक नजर पाहण्यासाठी आतुर असल्याचे सांगितले. त्यांनी ऐकले आणि रुग्णालयाच्या खिडकीतून भेटण्यासाठी आलेल्या सर्वांना पाहिले. तुम्हा सर्वांना पाहिल्यानंतर त्यांच्यात ताकद आली. ते व्हिलचेअरून उठून चालत आले. तुम्हाला पाहून ते मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले होते. जनता ही त्यांना हिंमत देणारी बाब होती. जनता ही त्यांची ताकद होती, असेही त्या म्हणाल्या.