Dehuroad News : देहूरोड येथे चार एकर ऊस आगीत जाळून खाक

एमपीसीन्यूज : देहूरोड येथील एक शेतकऱ्याच्या चार एकरातील उसाला शनिवारी सायंकाळी आग लागली. या आगीत संपूर्ण ऊस जाळून खाक झाला. या दुर्घटनेत संबंधित शेतकऱ्याचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, गेल्या वर्षीही मे महिन्यात याच शेतातील उसाला आग लागल्याची घटना घडली होती.

देहूरोड येथे शिवाजीनगर झोपडपट्टीजवळ चिलूराम दांगट यांची शेती आहे. ते बारमाही पिके घेत असतात. त्यांनी चार एकरात उसाची लागवड केली आहे. हा ऊस लवकरच ते गाळपासाठी कारखान्याला देणार होते. मात्र, शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक या उसाला आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. त्यात संपूर्ण ऊस जळून गेला.

या दुर्घटनेत दांगट यांचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके समजू शकले नाही. मात्र, अज्ञात समाजकंटकाने आग लावल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना चिलूराम दांगट म्हणाले, शेतातील कामे उरकून सायंकाळी घरी आल्यानंतर उसाला आग लागल्याचे निदर्शनास आले. काही क्षणात आगीने संपूर्ण ऊस पेटला.

आमच्या मोकळ्या शेतामध्ये संध्याकाळच्या वेळेस मद्यपींच्या पार्टी रंगलेल्या असतात. हे चित्र आम्ही कायम पाहत असतो. त्यांच्या दारूच्या बाटल्या आम्हालाच गोळा कराव्या लागतात. त्यांना हटकले असता आम्हाला दमदाटी केली जाते. काहीही संबंध नसलेली मंडळी विनाकारण आमच्या शेतशिवारात वावरत असतात. लगतच्या झोपडपट्टी परिसरातील काही मंडळी शौचालयासाठी आमच्या शेतामध्ये येत असतात.

यापूर्वी गेल्या वर्षी मे महिन्यात आमच्या उसाला अशीच आग लागली होती. त्यावेळी आमचे अडीच लाखांचे नुकसान झाले होते. त्यानंतर शनिवारी पुन्हा त्याच ठिकाणच्या उसाला आग लागली. या आगीमध्ये जवळपास तीन एकर ऊस जळाला असून त्यामध्ये 75 टक्के उसाचे नुकसान झाले आहे. हा ऊस कारखान्यात गेला असता तर चार लाख मिळाले असते. मात्र, आगीत सर्व ऊस जाळून मोठे आर्थिक नुकसान झाले.

आमच्या शेतात शिवारामध्ये अनोळखी इसम फिरत असतात. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस प्रशासनाने पावले उचलावीत. किमान संध्याकाळच्या वेळेस या परिसरात एकदा गस्त घालावी.

काही समाजकंटक शिवाजीनगर झोपडपट्टी परिसराकडून शेतात येत असतात. तो परिसर देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाने सगळा सील करावा. त्यामुळे आमच्या शेतीचे होणारे नुकसान टाळता येईल

झोपडपट्टी परिसरातील लोक शेतात बकऱ्या आणि गाई बैल सोडून देतात. त्यामुळे शेतीपिकांचे नुकसान होते. लहान मुले शेतामध्ये घुसखोरी करत असतात. ऊस चोरून नेण्याचे प्रकारही सर्रास घडत आहे. त्यांनाशेतात येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला दमदाटी केली जाते. असे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.