बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील सिनेमामधील शब्दांना सेन्सर बोर्डाचा खो

(हर्षल आल्पे)

एमपीसी न्यूज- नुकताच हिंदु हृदयसम्राट आणि महानायक बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर एक चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. या चित्रपटही काही शब्द, वाक्यांवर सेन्सर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. बाळासाहेबांच्या भाषणाच्या सीन्समध्ये काही सोकॉल्ड शब्द म्युट करण्याचे सुचवले आहे. वास्तविक बाळासाहेंबाच्या अनेक सभा, मुलाखती, अग्रलेख उभ्या महाराष्ट्राने ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत आणि अभ्यासल्या असताना शब्द, वाक्य वगळण्याचा आग्रह का ?

नुकतीच एक बातमी आली… की सेन्सर बोर्डाने काही शब्द ,काही वाक्यांवर आक्षेप घेतलाय. असंही कळलय की बाळासाहेबांच्या भाषणाच्या सीन्समध्ये काही सोकॉल्ड शब्द म्युट करण्याचे सुचवले आहे. आता प्रश्न असा आहे की सन्माननीय बाळासाहेंबाच्या अनेक सभा, मुलाखती, अग्रलेख उभ्या महाराष्ट्राने ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत आणि अभ्यासल्याही आहेत. ठाकरी शैली कशी आहे, हे सगळ्यांना परिचित आहे. माझ्या मनातलं माझ्याच भाषेत कोणीतरी जाहिररित्या बोलतयं हेच खूप समाधान सर्वसामान्य माणसाला मिळायचं. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मिळमिळीत न बोलता थेट हल्ला चढवायचा हीच तर ती शैली होती.

एखाद्या वादळीव्यक्तीच्या जीवनावर चित्रपट करायचा तर त्यात पर्यायाने वादळ हे आलंच पाहिजे. सिनेमा हे माध्यम वास्तवाचा आभास असला तरी त्यात वास्तव हे आलंच पाहिजे. ज्या शब्दांना, ज्या ओळींना आज हे आक्षेप घेतआहेत ते हजारो लोकांनी ऐकलेले आहेत आणि आता इंटरनेटच्या माध्यमातुन त्याला या 2019 च्या काळात उजाळाही दिला जातोय. हवं तर जाऊन बघु शकता ….

एवढं इतिहासाचं भान नसावं की त्या शब्दांच्या, त्या सीन्सच्या निमित्ताने तो काळ, ती एका विशिष्ट समाजाची खदखद बाहेर पडत होती ते फिल्ममेकर म्हणुन दाखवायला नको ? तो तर आत्मा आहे … की कसा हा माणुस, हा नेता आपल्या अमोघ वक्तृत्वाने आपलंस करायचा. काय तर म्हणे समाजात तेढ निर्माण होईल ! असं काहीही होत नाही, जोपर्यंत स्वार्थी, अप्पलपोटे राजकारणी त्याला खतपाणी घालत नाहीत. आजच्या इंटरनेटच्या युगात तुम्हाला खरच बंधन घालणे शक्य आहे ? एखाद्या गोष्टीवर बंधन घालु शकता तुम्ही ? सिनेमा येण्याआधी ट्रेलरने आणि नंतर येऊन झाल्यावर अनकट सिनेमा तुम्ही नेटवर पाहु शकता. मग तुम्ही हे फक्त स्वतःचा (अ)ज्ञानीपणा कशाला पुन्हा पुन्हा सिध्द करता ?

सिनेमातुन जे काही घ्यायच ते घेतील ना ! तुम्ही मात्र असा खोटेपणा करुन फक्त चावडीवरच्या फुटकळ चर्चा घडवता. बाकी काहीही नाही.
सिनेमा व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचुन बिझनेस करुन नवीन सिनेमाही येतो. तुमच्या कमिट्या बदलुन इतिहासजमा होतात ..,
निदान या निमित्ताने आंतरराष्ट्रीय पातळीवर असं काहीतरी करुन स्वतःच हसं करुन घेऊ नये. आपल्या देशातही जागतिक स्तरावरचा वास्तववादी चित्रपट बनण्यास मदत करावी एवढीच त्या सेन्सर बोर्डाला विनंती

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.