PCMC : उपमुख्यमंत्र्यांनी निर्देश देताच जलवाहिन्याच्या भूसंपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरासाठी ( PCMC) भामा आसखेड आणि आंद्रा धरणातील मंजूर पाणी आणण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या 26 किलोमीटर जलवाहिनीच्या कामासाठी आवश्यक जागेचे भूसंपादन करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश देताच जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. जागेचे भूसंपादन करण्यासाठी मावळ आणि खेड उपविभागीय अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नियुक्ती केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटनने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी झाले. या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी भामा आसखेड आणि आंद्रा धरणातील संपूर्ण मंजूर पाणी आणल्याशिवाय पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांना पुरेसे पाणी मिळणार नाही. आंद्रा आणि भामा आसखेड या दोन धरणातून 267 एमएलडी पाणी पिंपरी-चिंचवडला आरक्षित केले आहे. आंद्रा धरणातून शंभर एमएलडी पाणी उचलण्यात येणार आहे. यातून शहरातील पाणी समस्येवर तोडगा निघणार आहे.
उर्वरित आरक्षित पाणी येईपर्यंत वाढत्या भागाला पुरेसे पाणी मिळणार नाही. त्यासाठी पुढचा जलवाहिन्यांचा टप्पा महत्त्वाचा असून 26 किलोमीटरच्या जलवाहिनीसाठी जागा भूसंपादित करायची आहे. जिल्हा प्रशासनाने एका महिन्याच्या आत संपूर्ण जागा महापालिकेला दिली पाहिजे. त्याबाबत काहीही अडचण असेल, तर माझ्याकडे बैठक घेतली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यानंतर तातडीने सूत्रे हलली.जागेचे भूसंपादन करण्यासाठी मावळ आणि खेड उपविभागीय अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नियुक्ती केली ( PCMC) आहे.