Pimpri News – “शिक्षकांचा अनादर समाजाला अधोगतीकडे नेतो” – डॉ. पंडित विद्यासागर

एमपीसी न्यूज – “भारतीय संस्कृतीला प्रदीर्घ गुरुपरंपरा लाभली ( Pimpri News ) आहे. पाश्चात्त्य देशांत शिक्षकांविषयी आदर बाळगला जातो; कारण शिक्षकांचा अनादर समाजाला अधोगतीकडे नेतो, याची जाणीव तिथे आहे. असे विचार नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे काल व्यक्त केले. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून कलारंजन प्रतिष्ठान, सांगवी या संस्थेने आयोजित केलेल्या गुरुगौरव पुरस्कार समारंभात डॉ. पंडित विद्यासागर बोलत होते.

ज्येष्ठ समाजसुधारक आणि प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री गिरीश प्रभुणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच कलारंजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले आणि कार्यवाह शिरीष पडवळ यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

Pimpri : महापालिका आणि लाईटहाऊस कम्युनिटी फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार

याप्रसंगी पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या साईजीवन प्राथमिक विद्यालय कन्याशाळेतील संदीप वाघमोरे यांना शिष्यवृत्ती परीक्षांसाठी इंटरनेटशिवाय ऑफलाईन वापरता येणारे ऍप मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, ग्रंथ आणि पुष्प असे पुरस्काराचे स्वरूप होते.

तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पिंपरी – चिंचवड परिसरातील वेगवेगळ्या शाळांमधील गुरुजनांना प्रमाणपत्र, ग्रंथ, पुष्प प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये मुख्याध्यापिका माधुरी लवटे, योगिता सोनवणे, सरला पाटील, स्मिता जोशी, सुवर्णा वैद्य, सतीश अवचार, वनिता नेहे, सुरेखा कुंजीर यांचा समावेश होता.

डॉ. पंडित विद्यासागर पुढे म्हणाले की, “पुस्तकांमधून औपचारिक शिक्षण मिळते; परंतु शिक्षकांच्या वर्तनातून विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण मिळते. त्यामुळे शिक्षकांनी साधनशुचिता पाळण्याची नितांत आवश्यकता आहे.” गिरीश प्रभुणे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “कौशल्यावर आधारित शिक्षण ही काळाची गरज आहे!” असे मत मांडले. संदीप वाघमोरे यांनी सत्कारार्थींच्या वतीने प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले.

प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन आणि माधुरी लवटे यांनी सादर केलेल्या गुरुगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. श्रीकांत चौगुले यांनी प्रास्ताविकातून, “कोरोनाच्या काळात शिक्षकांनी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुगौरव सोहळा आयोजित केला आहे”

अशी संयोज.नामागील भूमिका मांडली. पूनम गुजर, धनश्री चौगुले, नटराज जगताप आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् मधील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष पडवळ यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात ( Pimpri News ) आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.