Satyapal Malik : मी लिहून देतो, आता मोदी सरकार परत सत्तेत येणार नाही; सत्यपाल मलिक यांचे मोठे वक्तव्य

एमपीसीन्यूज – मी लिहून देतो, आता मोदी सरकार परत येणार नाही’! असे (Satyapal Malik) भाकीत जम्मू-काश्मीर राज्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलेल्या मुलाखतीत केले.

राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik )यांच्याशी झालेल्या मुलाखतीचा व्हिडिओ त्यांच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे.

मुलाखतीच्या दरम्यान राहुल गांधी यांनी मलिक यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. 28 मिनिटांच्या या संभाषणात राहुल गांधींनी सत्यपाल मलिक यांच्याशी पुलवामा, शेतकरी आंदोलन, एमएसपी (MSP), जाती आधारित गणना, मणिपूरमधील हिंसाचार, शिक्षण यासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

PCMC : निवृत्ती वेतनधारकांच्या अस्तित्वाची पडताळणीसाठी ‘पेन्शनर ॲप’

या चर्चेदरम्यान सत्यपाल मलिक म्हणाले की, निवडणुकीसाठी फक्त 6 महिने उरले आहेत. मी लिहून देत आहे, हे सरकार आता येणार परत नाही.

 

जम्मू-काश्मीरवर काय म्हणाले मलिक?

सत्यपाल मलिक म्हणाले, माझे असे मत आहे की, तेथील (जम्मू-काश्मीर) लोकांवर बळाचा वापर करून आपलेसे करता येणार नाही. तिथल्या लोकांना जिंकून तुम्ही काहीही करू शकता. त्यावेळी मी त्या लोकांना विश्वासात घेतले. त्यांना राज्याचा दर्जा परत मिळावा, असे मला वाटते, असे मलिक म्हणाले.

सरकारने कलम 370 मागे घेत तेथे केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केली. सरकारला भीती वाटत होती की, राज्यातील पोलीस बंड करतील, मात्र जम्मू-काश्मीर पोलिसांनी केंद्र सरकारला नेहमीच पाठिंबा दिला आहे. तेथील लोकांना अमित शहा यांनी राज्याचा दर्जा परत करू, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा परत करून तेथे निवडणुका घ्याव्यात, असेही मलिक म्हणाले.

पुढे मलिक म्हणाले की, हे लोक काश्मीरला राज्याचा दर्जा का परत करत नाहीत, हेच मला कळत नाही. माझे त्यांच्याशी बोलणे झाले, मी म्हटले की त्यांना राज्याचा दर्जा परत बहाल केला पाहिजे. त्यावेळी मला सांगण्यात आल की, काय गरज आहे, सर्व काही ठीक चालले आहे. पण कुठेही ठीक चालले नाही. दहशतवादी घटना वाढल्या आहेत. दहशतवादी सक्रिय झाले आहेत. राजौरीमध्ये रोज काही ना काही घडत असते, असेही ते म्हणाले.

 

पुलवामा हल्ल्यावर काय म्हणाले मलिक?

 

राहुल गांधी यांनी मलिक यांना पुलवामा हल्ल्याबाबत प्रश्न विचारला असता सत्यपाल मलिक म्हणाले, मी पुलवामा हल्ल्याबाबत असे बोलणार नाही की सरकारने ते घडवून आणला, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याचा राजकीय वापर केला, असे मला म्हणायचे आहे. जेव्हा तुम्ही मतदानाला जाल तेव्हा पुलवामाच्या हौतात्म्याची आठवण करा, असे त्यांचे विधान आहे.

यादरम्यान राहुल गांधी म्हणाले की, शहीद जवानांचे पार्थिव विमानतळावर आणले गेले तेव्हा मी विमानतळावर पोहचलो, तेव्हा मला खोलीत कोंडून ठेवले होते. मी लढलो आणि तिथून बाहेर पडलो. सत्यपाल मलिक म्हणाले, त्यावेळी पंतप्रधानांनी श्रीनगरला जायला हवे होते. राजनाथ सिंह तिथे आले होते. मी तिथे होतो. आम्ही श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, ज्या दिवशी हे घडले त्या दिवशी ते (पंतप्रधान मोदी) नॅशनल कॉर्बेट येथे शूटिंग करत होते.

त्यामुळे मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण बोलणे झाले नाही. 5-6 वाजता त्यांचा फोन आला, काय झालं? मी घटनेबद्दल सांगितले मी म्हणालो, आमच्या चुकीमुळे इतके लोक मेले. तेव्हा त्यांनी (पंतप्रधान मोदी) मला सांगितले की तुम्हाला काहीही बोलण्याची गरज नाही, तुम्ही शांत रहा, यानंतर मला अजित डोभाल यांचा फोन आला, ते म्हणाले, तुम्हाला काही बोलण्याची गरज नाही. मी म्हटलं ठीक आहे… मला वाटल तपास करावा लागेल, कदाचित त्याचा परिणाम होईल. त्यात काही झाले नाही, होणारही नाही.

 

सत्यपाल मलिक म्हणाले, सीआरपीएफने गृह मंत्रालयाकडे 5 विमाने मागवली होती. हा अर्ज चार महिने गृहमंत्रालयाकडेच राहिला. नंतर त्यांनी ते नाकारले. ते चार महिने लटकत राहिले. तो अर्ज माझ्याकडे आला असता तर मी काहीतरी केले असते. हल्ला होऊ शकतो, असे संकेत आम्हाला मिळाले होते. ज्या वाहनाला धडक दिली ते स्फोटकांनी भरलेले होते, आणि ते 10 दिवस फिरत होते.

 

RSS च्या विचारसरणीवर काय म्हणाले मलिक?

भारतीय राजकारणात दोन विचारसरणींमध्ये लढा आहे असे मला वाटते, असे राहुल म्हणाले एक गांधीवादी आणि दुसरा आरएसएस. दोन्ही हिंदुत्वाचे विजन आहेत. एक अहिंसा आणि बंधुभावाची विचारधारा आहे. दुसरे म्हणजे, द्वेष आणि हिंसेचे.. यावर तुमचे काय म्हणणे आहे? या प्रश्नाला उत्तर देताना सत्यपाल मलिक म्हणाले, मला अस वाटतं की गांधींची दृष्टी टिकली तरच भारत देश म्हणून टिकेल. गाधींनी देशभर गावोगावी फिरून तो दृष्टीकोन आत्मसात केला होता. या विचारसरणीवर आधारित व्यवस्था असेल तरच देशाचा कारभार चालेल, अन्यथा त्याचे तुकडे पडतील. आपल्या सर्वांना न भांडता एकत्र राहायचे आहे.

 

सत्यपाल मलिक म्हणाले, महात्मा गांधी आणि काँग्रेसची दृष्टी आपल्या लोकांमध्ये पसरली पाहिजे, असे माझे मत आहे. लोकांना कळले पाहिजे की, आम्ही त्यांच्यापेक्षा (आरएसएस) किती वेगळे आहोत, हे लोकांना कळू द्या. त्यांच्यापैकी भारतातील राजकारणात सक्रिय असलेली कोणतीही व्यक्ती तो फक्त स्वतःसाठी सक्रिय आहे, तो देशाचा विचार करत नाही. देशाबद्दल विचार बनवत नाही, प्रसारित करत नाही.

 

मलिक म्हणाले की, एक चांगली गोष्ट म्हणजे लोकांनी टीव्ही पाहणे बंद केले आहे. आपल्याकडे आता सोशल मीडिया हे माध्यम आहे. पण हे लोक त्यावरही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर राहुल गांधी म्हणाले, माझे यूट्यूब अकाउंट दडपण्यात आले आहे.

 

मुद्द्यांवर इव्हेंट कसे तयार करायचे हे त्यांना माहीत आहे – मलिक

 

राहुल गांधी म्हणाले, जेव्हा सरकारवर दबाव असतो तेव्हा ते काहीतरी मुद्दा मधेच काढतात. जेव्हा मी गौतम अदानी यांच्याशी चर्चा केली तेव्हा प्रथम टीव्ही बंद करण्यात आला, नंतर मला संसदेतून बाहेर करण्यात आले. त्यानंतर विशेष अधिवेशनाची चर्चा झाली, ज्यामध्ये भारत आणि इंडियावर चर्चा झाली. शेवटी या लोकांनी महिला आरक्षण विधेयक आणले. तेही आता नाही तर 10 वर्षांनी येणार आहे. पुलवामा असो किंवा महिलांचा मुद्दा, त्यांच्याकडे चर्चा वळवण्याचा चांगला मार्ग आहे. यावर सत्यपाल मलिक म्हणाले, ते कोणत्याही गोष्टीतून इव्हेंट बनवतात. त्या मुद्याचा आपल्या बाजूने फायदा करून घेतात, महिला आरक्षण विधेयकावरही असेच केले गेले. यातून महिलांना काही मिळायचे नाही, पण त्यांनी किती मोठे काम केले आहे, हे यातून दाखवून दिले आहे. संसदेच्या नवीन इमारतीची गरज नसल्याचे मलिक म्हणाले. पण त्यांना त्यांच्या नावाचा दगड लावायचा होता म्हणून त्यांनी हे बांधले. ती जुनी इमारत अजून बरीच वर्षे टिकली असती.

 

राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा तुम्ही पुलवामा आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा तुम्हाला सीबीआय इतर संस्थांकडून धमकावले गेले. यावर मलिक म्हणाले, “कायदा असा आहे की तक्रारदाराला शिक्षा दिली जात नाही . मी ज्यांची तक्रार दिली त्यांची चौकशी झालीच नाही. माझी चौकशी करण्यासाठी ते तीन वेळा आले. मी म्हणालो, तुम्ही काहीही करा, तुम्ही माझे नुकसान करू शकणार नाही. मी फकीर आहे, माझ्याकडे काही नाही. वैतागून तो अधिकारी म्हणाला, “साहेब, आम्ही आमचे काम करतोय.” त्यांचीही एक मजबुरी आहे.”

 

आम्ही तुमच्याशी बोललो तर तुमच्यावरही हल्ला होईल, असे राहुल गांधी म्हणाले. यावर सत्यपाल मलिक म्हणाले, मला काही फरक पडत नाही.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.