Wakad : किरकोळ वादातून तिघांवर वार; एकाला मारहाण

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून कट मारल्याच्या कारणावरून भांडण सुरु होते. हे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तिघांना मारहाण करून त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना मंगळवारी (दि. 7) रात्री नऊच्या सुमारास थेरगाव मधील काळेवाडी फाट्याजवळ घडली.

संदीप जयरविन्द्र अडसूळ (वय 25, रा. काळेवाडी फाटा, संभाजीनगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनिकेत हरिश्चंद्र काळे (वय 25), रवींद्र जगदीश पोखरकर (वय 24), हृषीकेश हरिराम पांचाळ (वय 19, तिघे रा. अशोका सोसायटी, काळेवाडी), आदेश दिलीप बालवडकर (वय 19, रा. गावडे भोईर आळी, चिंचवड गाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेण्यात आले आहे. प्रितम जयरवींद्र अडसूळ (वय 24), प्रेम जयरवींद्र अडसूळ (वय 27), संदीप जयरविन्द्र अडसूळ व केरबा मगर अशी जखमींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीपची एका अल्पवयीन मुलासोबत भांडण सुरु होते. संदीपला दोन ते तीन मुले मारत असल्याचे पाहून प्रीतम आणि प्रेम भांडण सोडविण्यासाठी आले. त्यावेळी वरील चारही आरोपींनी तीन भावांसह मगर यालाही मारहाण केली. प्रीतम, प्रेम आणि केरबा या तिघांवर चाकूने वार केले. यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम आर स्वामी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.