Hinjawadi: हिंजवडी फेज तीन पर्यंतचा रस्ता पालिकेकडे हस्तांतरित करा; उड्डाणपूलासाठी आर्थिक सहाय्य द्या

शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सावित्रीबाई फुले उद्यान ते हिंजवडी फेज-तीनपर्यंत ‘फ्रीवे’ उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी वाकड उड्डाणपुलाच्या हद्दीपासून हिंजवडी फेज-तीन पर्यंतचा रस्ता एमआयडीसीकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावे. त्याचबरोबर नियोजित उड्डाणपूलासाठी राज्य शासनाने अर्थसहाय्य करावे, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. 

कलाटे यांनी देसाई यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. नगरसेवक अमित गावडे, नगरसेविका रेखा दर्शिले, अश्विनी वाघमारे, विक्रम वाघमारे यावेळी होते.

पिंपरी-चिंचवड शहरच्या हद्दीवरच हिंजवडी इन्फोटेक पार्क विकसित झालेला आहे. हिंजवडी मधील पायाभूत सुविधा विकसित करणेची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची देखील आहे. हिंजवडी येथे पुणे व पिंपरी-चिंचवड मधील जोड रस्त्यांवरून दररोज सुमारे साडे तीन लाख वाहने ये-जा करतात. त्यामुळे वाकड येथून शिवाजीपार्क हिंजवडी येथे पोहोचण्यासाठी तब्बल दीड ते दोन तासाचा कालावधी लागतो. त्यामुळे नाहक वेळ वाया जात आहे. तसेच इंधन खर्चामुळे राष्ट्रीय आर्थिक नुकसान होत असून प्रदुषण देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

याठिकाणी होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पिंपरी महापालिकेतर्फे सावित्रीबाई फुले उद्यान ते हिंजवडी फेज-तीनपर्यंत फ्रीवे उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. परंतु, वाकड उड्डाणपुलाच्या हद्दी पासून फेज-तीनहद्दी पर्यंतचा रस्ता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यामध्ये असल्याने महापालिकेमार्फत या जागेवर काम करण्यासाठी महामंडळाची परवानगी मिळणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात महामंडळाने परवानगी दिल्यास काम पूर्ण करून देखभाल करणे महापालिकेला सोयीचे होणार आहे. त्यासाठी हिंजवडी महापालिका हद्दीपासून ते हिंजवडी फेज-तीनपर्यंतचा महामंडळाच्या मालकीचा रस्ता महापालिकेकडे हस्तांतरित केल्यास आर्थिकदृष्ट्या देखील फायद्याचे होईल.

त्यामुळे हिंजवडी परिसरात काम करणा-या अभियंता वर्गाचा व वाकड, थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी व नाशिक फाटा परिसर, औंध या परिसरात राहणा-या नागरिकांची गैरसोय होणार नाही.  त्यामुळे  वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे, असे कलाटे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.