महाभारतात एकाएकी घुसले रामायण…

एमपीसी न्यूज – मुंबई महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीतून भाजपने अचानक माघार घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा दणका दिला. त्यामुळे इतके दिवस एकमेकांवर होणा-या टिकाटिपण्णी राजकीय समीकरणे यांवर लगाम बसला. मुंबई महापालिकेत झालेल्या या घडामोडींवर कवी अनिल वसंत दीक्षित यांनी कवितेतून, असे मिश्कील भाष्य केले.

 

महाभारतात एकाएकी घुसले रामायण       
   

गादीसाठी चाललेली
जबरी ओढाताण
ज्याने त्याने रोखलेला
एकमेकांवर बाण

कोण शकूनी, धृतराष्ट्र ?
कोण कौरव – पांडव ?
एकमेकांनाच उद्देशून
प्रचंड आकांड तांडव

काही कळेना अचानक
जादू कशी घडली ?
भाऊ भाऊ म्हणत सगळी
गळ्यात पडून रडली

सट्टेवाले, ज्योतिषांचे
अंदाजच फसले
महाभारतात एकाएकी
रामायणच घुसले

मोठ्ठा भाऊ राम समजून
तुम्हीच बसा गादीवर
आम्ही आपले भरतासारखे
कमळं वाहू चरणांवर

कवी अनिल वसंत दीक्षित (सारंगनिल)
9922613375

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.