Shirur : शिरुरमधील निवडणूक व्यक्तीची नसून जनतेची झालीय – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – शिरुर मतदार संघातील अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामुळे ही निवडणूक कोणा व्यक्तीची नाही. ही निवडणूक मतदार संघातील बेरोजगार तरुण, अपेक्षाभंग झालेल्या शेतक-यांची झाली आहे, शिरुरमधून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

डॉ. अमोल कोल्हे म्हणतात, शिरुर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणाला संधी दिली. त्याबद्दल मी पक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे मनापासून आभार मानतो. मला उमेदवारी जाहीर झाल्याने निवडणूक सोपी झाली आहे. अस विरोधकांना वाटते. परंतु, कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला कमी लेखण ही माझी संस्कृती नसल्याच मी नम्रतापूर्वक सांगू इच्छितो. त्यातच ही निवडणूक कुणा व्यक्तीची राहिली नसून जनतेची झाली आहे. कारण, गेल्या पाच वर्षात मतदार संघातील जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे.

सर्वसामान्य जनता तासनतास वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली आहे. महागाईमध्ये भरडली आहे. बैलगाडी शर्यतीवरील न हटलेली बंदी, शेत मालाचे कोसळलेले दर, शिवनेरी आणि वढू तुळापूर येथील ऐतिहासिक ठेव्याचा रखडलेला विकास, खेळाडूंसाठी प्रशिक्षण केंद्र झालेली नाहीत. पर्यटन केंद्राचा विकास झाला नाही. असे अनेक प्रलंबित प्रश्न घेऊन आता जनताच निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. त्यामुळे ही निवडणूक कोणा व्यक्तीची नाही. ही निवडणूक मतदार संघातील बेरोजगार तरुण, अपेक्षाभंग झालेल्या शेतक-यांची आहे.

मला सेलिब्रिटी उमेदवार म्हटल जात असेल तर नेता असो वा सेलेब्रिटी तो कोण असावा हे सुज्ञ जनताच ठरवेल. त्यांचा खासदार कोण आणि कसा असला पाहिजे ते येत्या काळात ही निवडणूक कोणत्या अंगाला जाईल हे स्पष्ट होईलच. माझा मतदार राजावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे या संधीचे सोनं करण्याचा आणि जे आजपर्यंत झालं नाही ते म्हणजे मतदार संघातील प्रश्न प्रभावीपणे संसदेत मांडून त्याची सोडवणूक करणे. त्यादृष्टीने पावल टाकण्याचा माझा कसोशीने प्रयत्न असेल, असे कोल्हे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.